मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो. मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला.
एका टि.व्ही.चॅनेलवरील संवादा दरम्यान मनसे प्रमुख यांनी राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाल्याचे वक्तव्य करत गेल्या काही वर्षात जातीच्या आधारावर राजकारणात वाढ झाल्याचे वक्तव्य केले होते. त्याच उत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वरील वक्तव्य केले.
या देशात मनुवादी व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि त्याअंतर्गत जातीव्यवस्था उभ्या राहिल्या. मात्र यामुळे जातीआधारावर अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला हे राज ठाकरे यांना बहुतेक माहीत नसावे असा उपरोधिक टोला लगावत ते म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. समता मुलक समाज घडवण्याचं काम केलं हेही राज ठाकरे यांना माहीत नसावे. राज ठाकरे यांनी अज्ञानातून हे वक्तव्य केले असावे असा आरोपही त्यांनी केला.
मागील काही वर्षात राज्यातील जातीय संघर्ष आणि आरक्षणाच्या प्रश्नी विविध समाजाकडून काढण्यात येत असलेल्या मोर्चे, निदर्शनांच्या धर्तीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी वक्तव्य केले. राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे पहिल्यांदाच जातीय राजकारणाबाबत पहिल्यांदाच जाहिर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच यासंदर्भात एखाद्या राजकिय पक्षाला जबाबदार ठरविण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध असतानाही राज ठाकरे यांनी वक्त्यव्य केले.