मुंबईः प्रतिनिधी
लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे. लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे, त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीनंतर दिले. यावेळी राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली.
कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, एकेका रुग्णांचे किमान २० तरी संपर्क शोधलेच पाहिजेत. सर्व काही व्यवहार सुरू झाले आहेत, निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे, त्यात जणू काही कोरोना संपला असे सगळे वागत आहेत, परिणामतः आपल्याच घरातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना आपण धोक्यात आणतो आहोत याची जाणीव त्यांना होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
मधल्या काळात आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवून राज्याचा आरोग्य नकाशा तयार केला. यातील सह व्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करा, ज्या ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉक डाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घेण्याचे आदेशही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा
गेले वर्षभर आपण कोरोनाशी लढतांना विविध क्षेत्रांसाठी नियम ( एसओपी) ठरविली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही हे गंभीर बाब असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
विशेषतः इतके दिवस थांबलेले लग्न समारंभ सुरू झाले आहेत, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रम कुठल्याही आरोग्याच्या नियमविना होतांना दिसतात. उपाहारगृह, हॉटेल्सच्या वेळा आपण वाढविल्या आहेत. मात्र नियमांचे पालन होतांना दिसत नाही. स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी अशा सर्व ठिकाणी भेटी देऊन तत्काळ कारवाई केली पाहिजे असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.
ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांवर परवाने रद्द करण्याची कडक कारवाई प्रसंगी करा,
लोकांमध्ये बेफिकिरी आली असली तरी स्थानिक प्रशासन व पोलिसांत कर्तव्यात ढिलाई नको, हॉटेल्स, उपाहारगृहे यांना वेळा वाढवून दिल्या आहेत. मात्र नियम पाळत नसतील तर लगेच कडक कारवाई करा. सार्वजनिक ठिकाणी पालिकांनी जंतुनाशक फवारणी नियमित करणे सुरू करावी असे आदेशही महापालिका आयुक्तांना त्यांनी दिले.
गावागावात जाऊन फिरत्या वाहनाद्वारे लोकांच्या चाचण्या वाढवा, ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटलमधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू आहेत का याची खात्री करा. ही सुविधा वापरण्याची वेळ येऊ नये पण तयारीत राहा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याशिवाय नागरीकांनीही खबरदारीचे सर्व नियम पाळवेत असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जाण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा राज्यातील जनतेला दिला.