मुंबई : प्रतिनिधी
देशाचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट काही दिवसांवर येवून ठेपला आहे. यादिवशी सर्वचस्तरावर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधी आणि शहिद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना, स्वातंत्र्यसैनिकांना बोलाविण्यात येते. यंदाच्या १५ ऑगस्टला कोविड योध्दे असलेल्या डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवेक असलेल्या कोविड योध्दे आणि कोरोना आजारावर केलेल्या रूग्णांना प्रत्येक शासकिय ध्वजवंदन कार्यक्रमात बोलविण्याची सूचना राज्य सरकारने सर्व शासकिय कार्यालयांना केली. यासंदर्भातील शासन आदेश नुकताच जाहिर झाला.
स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह काही प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रण देण्यात येते. तसेच त्या त्या भागातील शहीदांच्या कुटुंबियांनाही या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात येते. मात्र यंदा पहिल्यांदाच कोविड योध्दे असलेल्या डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक आणि सफाई कर्मचारी यांच्यासह कोरोना आजारावर मात केलेल्या नागरिकांनाही कार्यक्रमास निमंत्रित करण्यास सांगण्यात आले.
त्याचबरोबर यादिवशी सोशल मिडियाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारतचा प्रचार करावा असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनास देण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता कार्यक्रमाला येणाऱ्यांनी मास्क परिधान करणे, शाररीक अंतर पाळणे आदी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व नागरिकांना घरबसल्या हा सोहळा पाहता यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करावे अशी सूचनाही जिल्हा प्रशासनास करण्यात आली.
राज्यात मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या हस्ते ध्वज वंदनाच्या वेळा निश्चित करण्यात आली असून या दोघांच्या हस्ते मुंबई आणि पुणे येथे सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी ध्वज वंदन करण्यात येणार आहे. सकाळी ८.३५ ते ९.३५ या कालावधीत कोणालाही ध्वजवंदन करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी ध्वजवंदन केल्यानंतरच जिल्हास्तरावर पालक मंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यास सांगण्यात आले आहे. एखाद्या खाजगी संस्थेला ध्वजवंदनाचा कार्यक्रम करायचा असेल तर तो ८.३५ पूर्वी किंवा ९.३५ नंतर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.