औरंगाबाद : जगदीश कस्तुरे
पंजाब नँशनल बँकेत ११ हजार कोटी रूपयांचा घोटाळा करून देशाबाहेर पळून जाणाऱ्या निरव मोदीच्या औरंगाबादेतील गीतांजली शोरूमवर आज ईडीने धाड टाकली. मोदीचे शोरूम प्रोझोन मॉल मधील गीतांजली कंपनीची रत्ने विकणार्या शोरुमवर धाड टाकण्यात आली असून ईडीचे सहाय्यक संचालक आणि काही जवाहिरांच्या पथकाने धाड टाकली असल्याचे समजते. तसेच या शोरूमवरील कारवाई मंगळवार सकाळ पर्यंत सुरु राहणार असल्याचे वरिष्ठ सुत्रांनी सांगितले.
या धाडीत प्रत्येक हिर्यांची जवाहिरे पारखून किंमत ठरवणार आहेत. तसेच दुकानदाराने विकलेली रत्ने त्याचा दर्जा व किंमत याचा अभ्यास करुन कारवाई केली जाणार आहे. गेल्या १४ फेब्रूवारी रोजी पंजाब नॅशनल बॅकेत झालेल्या ११,३४६ कोटी च्या गैरव्यवहाराची वाच्यता झाल्या नंतर या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन हे प्रकरण पुढील तपासासाठी ईडीकडे सोपवण्यात आला. देशभरात नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्याशी संबंधित सर्व कंपन्यांवर ईडीकडून टाकलेल्या धाडीत ५ हजार ६०० कोटी रु.ची मालमत्ता जप्त केल्याची प्राथमिक माहिती आहे. औरंगाबादेतील धाडही याचाच भाग आहे. औरंगाबादेत मेहूल चोकसीशी घनिष्ठ संबध असणार्या दोन व्यापार्यांची नावे ईडीच्या पथकाला मिळाली आहेत. गेल्या ४ वर्षांपूर्वी गितांजली जेम्स याची फ्रॅंचाईझी या दोन व्यापार्यांनी घेतली होती. पण कंपनीचे उत्पादने सुमार दर्जाची असल्यानंतरही फ्रॅंचाईझींना गीतांजलीचे अधिकारी असलेल्या किंमतीच्या अडीचपट दराने विक्री करण्यास सांगत. त्यामुळे या दोन्ही फ्रॅंचाईझी बंद पडल्या. शहरातील कारवाईबाबत ईडीच्या सुत्रांनी कमालीची गुप्तता पाळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणाची माहिती दिल्लीतून देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.