मुंबई : प्रतिनिधी
राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचविण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने आयोजित केलेल्या मँग्नेटीक महाराष्ट्र या कार्यक्रमाकडे सत्तेतील भागीदार असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पाठ फिरवली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उध्दव ठाकरे यांना विशेष पाहुणे म्हणून राज्य सरकारकडून निमंत्रित करण्यात आले होते. मात्र ठाकरे हे गैरहजर राहील्याने या कार्यक्रमातील मँग्नेटीक काही शिवसेनेला खेचू शकला नाही अशी चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू झाली.
मँग्नेटीक महाराष्ट्रा गुंतवणूक-२०१८ या गुतंवणूक समेटच्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा काल रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित पार पडला. कालच्या कार्यक्रमाला ठाकरे यांना निमंत्रित न केल्याने आज त्यांच्या उपस्थितीत महाउद्योगरत्न सन्मान रजनी या कार्यक्रमाचे आयोजन राज्य सरकारने केले. तसेच त्याविषयीच्या जाहीरातीही सर्व वर्तमान पत्रात दिल्या. तरीही ठाकरे हे कार्यस्थळी न आल्याने त्यांच्या गैरहजेरीतच कार्यक्रमाला सुरुवात झाली.
केंद्रातील आणि राज्यातील सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होण्याची कालची तिसरी वेळ होती. मात्र प्रत्येक कार्यक्रमाला प्रोटोकॉलचे निमित्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना निमंत्रित करण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळले. कालच्याही उद्घाटन सोहळ्याला ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला उध्दव ठाकरे यांनी उपस्थिती लावण्याचे टाळल्याची चर्चा राजकिय वर्तुळात आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या सभेत २०१९ च्या निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा उध्दव ठाकरे यांनी केल्यानंतर भाजप आणि शिवसेनेतील दरी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. ही दरी कमी करण्यासाठी भाजपकडून पध्दतशीर प्रयत्न करण्यात येत असल्याचे एकाबाजूला दाखविण्यात येत असले तरी दुसऱ्याबाजूला शिवसेनेला मोठ्या कार्यक्रमांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
याच अनुषंगाने काल झालेल्या उद्घाटन सोहळ्यास उध्दव ठाकरे यांना निमंत्रित केले नाही. त्यामुळे महाउद्योगरत्न सन्मान रजनी या कार्यक्रमाकडे त्यांनी पाठ फिरविल्याचे सांगण्यात येत आहे.