भाजपाच्या महिला पदाधिकारी रिदा रशीद यांनी बाजूला व्हा असे म्हणून हाताने बाजूला सरकारवल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयाने अटपूर्व जामीनही आज मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी मंजूर केला. यासंपूर्ण प्रकरणावरून उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपावर निशाना साधला.
सुषमा अंधारे यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून एक व्हिडिओ अपलोड केला असून यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री शिंदे गटावर टीकास्त्र सोडले.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, भारतीय संविधानात ९९ दोषी सुटले तरी चालतील, पण एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये असं म्हटलं आहे. तरी ज्या पद्धतीने संजय राऊतांना अटक झाली आणि न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना सांगितलं की ही अटकच बेकायदा होती. आता पुन्हा नवा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या बाबतीत होत आहे. विनयभंगाची व्याख्या काय, हे एकदा गृहमंत्री आणि सगळ्याच भाजपाच्या नेत्यांनी अभ्यासण्याची गरज आहे.
'ताई बाजूला सरका' असं म्हणणे जर विनयभंगाचा गुन्हा दाखल होत असेल तर मग अब्दुल सत्तार आणि गुलाब पाटील यांच्या अश्लाघ्य आणि गलिच्छ भाषेबद्दल कोणता गुन्हा नोंदतील?
समर्थन दिले म्हणून अटक करणार असाल तर होय मी आव्हाडांची बहीण आहे. मला अटक करा. @jitendradixit @Dev_Fadnavis @cbawankule pic.twitter.com/SEPaQzzy5G— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) November 15, 2022
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, बाजूला व्हा असं म्हणणं विनयभंग असेल, तर अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांच्यावर कोणते गुन्हे दाखल करावे लागतील? पण आम्ही असं म्हटलं तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमचे ज्येष्ठ बंधू चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की जे लोक समर्थन करतायत, त्यांच्यावरही आम्ही कारवाई करू. मग चंद्रशेखरदादा, ना आपण गृहमंत्री आहात, ना आपण कोणत्या न्यायालयीन पदावर आहात. आपण असा फतवा कसा काढू शकता?, असा खोचक सवालही चंद्रशेखर बावनकुळेंना केला.
जर खरंच आपल्याला वाटत असेल की समर्थन करणाऱ्यांनाही तुम्ही अटक कराल, तर कायद्याची अभ्यासक म्हणून सांगते, होय.. आम्ही जितेंद्र आव्हाड यांना समर्थन देतोय. तुम्हाला अटक करायची असेल, तर तुम्ही बिनधास्त अटक करू शकता. महाराष्ट्राला एकदा कळू द्या की तुमची मनमानी आणि सूडबुद्धीचं राजकारण कोणत्या पातळीवर जात आहे, असे आव्हानही त्यांनी भाजपा आणि शिंदे-फडणवीस सरकारला दिले.
माजी मंत्री आणि चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते म्हणून ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड साहेब यांच्यावर दाखल केलेल्या 354 चा जाहीर निषेध.. !
शिंदे साहेब महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर निम्नतम होत आहे कृपया अजूनही वेळ गेले नाही आवर घाला स्वतःच्या स्वतःकांक्षी प्रवृत्तीला.. @Awhadspeaks pic.twitter.com/gxBncDzVVM— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) November 14, 2022