Breaking News

शरद पवार यांचे सूचक वक्तव्य, ईडीच्या कारवाईत भाजपाचा नेता…

ईडी हा भाजपाचा सहकारी पक्ष असून त्यांच्यामार्फत विरोधकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम सुरू आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमधून केला.

शरद पवार म्हणाले की, या देशातील केंद्रीय यंत्रणांचा वापर निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या लोकांसाठी यापूर्वी फारसा कधी झाला नाही. सध्याच्या घडीला ईडी, सीबीआय इतर एजन्सींचा ठिकठिकाणी गैरवापर केला जात आहे. कर्नाटकमध्ये एका वरिष्ठ मंत्र्यावर कारवाई झाली. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्याला अटक करण्यात आली. डी. के. शिवकुमार यांना न्यायालयाने निर्दोष सोडले. एखाद्या राज्यातला इतका वरिष्ठ नेता त्याला अटक करणे, कोर्टाने त्याला सोडणे याचा अर्थ स्वच्छ आहे की ईडीचा गैरवापर केला जात आहे. असा आरोपही केला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातही या सगळ्याचा वापर सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख यांनी एका संस्थेला १०० कोटी रुपये दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यासाठी त्यांना अटकही झाली. आता असे दिसत आहे की चार्जशीटमध्ये ती रक्कम १ कोटी आहे. तसेच ती देणगी आहे. तरीही देशमुख यांना त्यात अडकवण्यात आले. आता न्यायालयाचा निर्णय काय लागेल ते पाहणे आवश्यक आहे. एक प्रकारची दहशत निर्माण केली जाते आहे अशी टीका केली.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, ईडीच्या ५ हजार ९०६ कारवायांपैकी केवळ २५ कारवायांचा निर्णय झाला आहे. गेल्या ११ वर्षामध्ये ईडीने १४१ नेत्यांची चौकशी केली. त्यातील ८५ टक्के नेते हे विरोधी पक्षातील नेते होते. तसेच ११५ नेत्यांवर कारवाई झाली ते सगळे बिगरभाजपचे होते. यातील २४ काँग्रेसचे, १९ तृणमूल काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादीचे १८ आहेत, शिवसेनेचे आठ आहेत. डीएमके ६, आरजेडी ५, समाजवादी पार्टी ५, सीपीएम ५, आप ३, नॅशनल कॉन्फरन्स २, मनसे १, पीडीपी २, एआयडीएमके १ आणि टीआरएस १ पक्षातील नेत्यांचा समावेश आहे. १२१ नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षातील १४ मंत्री, २४ खासदार, २१ आमदार, ७ माजी खासदार, ११ माजी आमदार अशा नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ईडीकडून कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये एकही भाजपाचा नेता नाही असे सूचक वक्तव्य केले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, काँग्रेसच्या २००४ ते २०१४ या काळात ईडीने २६ जणांवर कारवाई केली आहे. या २४ मध्ये काँग्रेसचे पाच नेते आहेत, तर भाजपचे ३ नेते आहेत. यावरुन असं दिसतंय ही यूपीएच्या काळात ईडी राजकीय हेतूने वागत नव्हती. त्या पद्धतीने कारवाई करत नव्हती. त्यामुळे ईडी हा भाजपाचा एक सहकारी पक्ष ठरला आहे. ईडी कधी कारवाई करणार, कोणावर करणार हे सगळं भाजपा नेत्यांना माहिती असतं, असा उपरोधिक टोलाही लगावला

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, रोहित पवार यांना दोन ते तीन दिवसांत चौकशीसाठी बोलवले गेले आणि त्यांच्या संस्थेची जप्ती करणे आणि कारवाई सुरू करणे हे दिसते आहे. त्यांच्यावरचा आरोप असा आहे की ते साखर कारखाना विकत घेतानाचे त्यांचे टेंडर मोठे होते. आता बँकेने विकलेल्या कारखान्यांची यादी पाहिली तर ते २५ कोटींच्या आत साखर कारखाने विकले गेले, तिथे कारवाई नाही. पण ५४ कोटीला कारखाना विकल्यावर त्याची चौकशी सुरू झाली. त्यामुळे दहशत निर्माण करणे, सक्रिय कार्यकर्त्याला थांबवणे हे यामागचे षडयंत्र आहे असा आरोपही केला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *