Breaking News

कांदा प्रश्नावरून बच्चू कडू यांचा प्रहार, हे नामर्दाचं सरकार…फक्त ग्राहकांचा विचार करणार केवळ सत्ता टीकविण्यासाठी हे सगळं

नुकतेच राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेल्या दादा भुसे यांनी कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही असे वक्तव्य करत जर कांदा महाग झालाय असं वाटत असेल तर खावू नका असे सांगत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला. त्यातच शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लागू केलेल्या ४० टक्के शुल्कावरून राज्यात राजकिय पक्षांबरोबरच, विविध संघटना आणि शेतकऱ्यांनी केंद्राच्या विरोधात आंदोलन सुरु केले. या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारचे समर्थक तथा प्रहार सामाजिक संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करत हे नामर्दाचे सरकार असून फक्त सत्ता टिकविण्यासाठी फक्त ग्राहकांचा विचार करत असल्याची टीका केली.
बच्चू कडू हे आज पुणे दौऱ्यावर दिव्यांग योजना आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सध्या कांदा प्रश्नावरून राज्यातील शेतकऱ्यांकडून आणि विविध राजकिय पक्षाच्या नेत्यांकडून राज्य आणि केंद्र सरकारवर एकच हल्लाबोल करण्यात येत आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या निर्यातीवर आकारण्यात येत असलेल्या ४० टक्के शुल्काच्या विरोधात दररोज आंदोलनही करण्यात येत आहे. या सगळ्या गोष्टी होत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर काहीच बोलायला तयार नाहीत.

आमदार बच्चू कडू यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, कांदा नसेल तर माझ्याकडे लसूण आहे. आमच्याकडे कांद्याच्या ताकदीचाच लसूण आहे. कांदा खरेदी करणं तुमच्या जीवावर येत असेल तर माझ्याकडे मुळासुद्धा आहे. यासाठी इतकी बोंबाबोंब करायची काय गरज आहे? असा खोचक सवाल केला.

आमदार पुढे बच्चू कडू म्हणाले, कधीकधी हे सरकार नामर्दासारखं वागतं. ही नामर्दानगी आहे. केवळ सत्ता टिकावी म्हणून सरकारने फक्त ग्राहकांचा विचार केला. सरकारने खाणाऱ्यांचा विचार केला पण हे सरकार पिकवणाऱ्याचा विचार का करत नाही? असा सवाल करत सरकारने ही नालायक प्रवृत्ती सुधारली पाहिजे. मी जरी या सरकारमध्ये, सत्तेत, एनडीएत असलो तरी शेतकऱ्याच्या बाजूने हे वक्तव्य मला करावंच लागेल असं सांगत पुढे बच्चु कडू म्हणाले की, शेतमालाचा भाव वाढल्यावर तुम्ही हस्तक्षेप करता, मग भाव पडल्यावर का करत नाही? मागे कांद्याला क्विंटलमागे २० रुपये दिले जात होते, क्विंटलमागे शेतकऱ्याचं १,००० रुपयांचं नुकसान होत होतं. कांदा खाल्ला नाही म्हणून लोक काही मरत नाहीत. आतापर्यंत मेलंय का कोणी? कांदा न खाल्ल्यामुळे कोणी मेल्याचं एखादं उदाहरण आहे का तुमच्याकडे? असा सवालही केला.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *