जर अतिरेक्यांनी भारतात घुसून येथील शांतता बाधित केल्यास अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून मारू असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देत अतिरेकी कारवायांसाठी पाकिस्तानी भूमीचा वापर करण्यात येत असेल तेथेही घुसून भारत सरकार दहशतवाद्यांना सोडणार नाही, असा सज्जड दम पाकिस्तानला दिला. पाकिस्तानने शनिवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या इशाऱ्याचा निषेध केला.
राजनाथ सिंग यांनी दिलेल्या इशाऱ्याचा निषेध करत पाकिस्तानने राजनाथ सिंह यांचे वक्तव्य म्हणजे प्रक्षोभक आणि अकल्पित असल्याचे सांगत असे वक्तव्य केवळ दीर्घकालीन रचनात्मक प्रतिबध्दतेच्या शक्यतांना अडथळा आणते असे एका प्रसिध्दी पत्रकान्वये आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
पाकिस्तानने जारी केलेल्या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, पाकिस्तानने नेहमीच सीमावर्ती आणि पाकिस्तानला लागून असलेल्या प्रदेशातील शांततेसाठी आपली वचनबद्धता दर्शविली आहे, इतिहास पाकिस्तानच्या दृढ संकल्प आणि स्वतःचे संरक्षण आणि बचाव करण्यास सिध्द असल्याचेही स्पष्ट केले.
‘द गार्डियन’ मधील एका अहवालाला उत्तर देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वरिल इशारा दिला.
एका इंग्रजी संकेतस्थळाला मुलाखत देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले की, कोणत्याही दहशतवाद्याने भारताची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास, आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ. जर ते (दहशतवादी) पाकिस्तानात पळून गेले असतील तर त्यांना पाकिस्तानात घुसून मारून असा इशारा दिला होता.
तसेच पुढे बोलताना राजनाथ सिंग म्हणाले की, भारताने कधीही कोणत्याही देशावर हल्ला केला नाही किंवा दुसऱ्या देशाचा भूभाग बळकावण्याचा प्रयत्न केला नाही. पण जर कोणी भारताला किंवा येथील शांततेला धोका निर्माण केला तर त्यांना सोडणार नाही असा निर्वाणीचा इशाराही दिला.
भारत अशा प्रकारे हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पुरेसा सामर्थ्यवान आहे आणि पाकिस्तानला देखील ते समजू लागले आहे, असा दावाही राजनाथ सिंग यांनी केला. दरम्यान, ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनच्या अहवालात भारताने पाकिस्तानमध्ये अनेकांना लक्ष्य करून त्यांच्या हत्या केल्याचा आरोप केला. तर केंद्र सरकारने हे दावे खोटे आणि द्वेषपूर्ण असल्याचे सांगत भारतविरोधी प्रचार म्हणून फेटाळून लावले.