मुंबई : प्रतिनिधी
मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी राज्यभर केलेल्या आंदोलनात शेकडो निरपराध आंदोलनकर्त्यांवर राज्य सरकारने गुन्हे दाखल केले. या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचे जाहीर आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची आठवण शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करून देत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मराठा समन्वयकांनी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्यासमोर कैफीयत मांडली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर केलेल्या आंदोलनात सुमारे १० हजार ७०० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या कार्यकर्त्यांवरील गुन्हे अद्याप मागे घेतले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी जाहीर आश्वासन देवून दोन महिने झाले तरी गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली नाही. तसेच अनेक कार्यकर्त्ये फरार असल्याची माहिती मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिली.
या कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घेवून मराठा समाजाला दिलासा द्यावा असे आवाहन ठाकरे यांनी केले.
त्याचबरोबर कोपर्डी प्रकरणाचा निकाला लागला तरी अद्याप गुन्हेगारांना फाशी झाली नाही. तरी त्यांना त्वरीत फाशी व्हावी यासाठी पुढील न्यायालयीन प्रक्रिया फास्ट ट्रँक न्यायालयाच्या माध्यमातून करावी तसेच उज्जव निकम यांना सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली.
दरम्यान, उध्दव ठाकरे यांनी मराठा मोर्चाला कायम पाठिंबा असून याप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी लवकरच चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.