पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्यावतीने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या बोली भाषेतून चौकार षटकार लगावले. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या विधानांमुळे भर पत्रकार परिषदेत पत्रकारांमध्ये हशा पिकला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही तिघेही विरोधी पक्षनेता होतो. आमच्याकडे सर्व अनुभवी लोक आहेत. आम्ही विरोधाला विरोध केला नाही. बाळासाहेबांनी काय शिकवलं, चांगल्याला चांगलं म्हणा. तसं काम आम्ही केलं. केवळ विरोधाला विरोध न करता, चांगल्याला चांगलं म्हणण्याची वृत्ती असली पाहिजे. जिथे सरकार चुकतंय तिथे नक्की जाब विचारण्याची जबाबदारी विरोधी पक्षाकडे असते. पण सध्या विरोधी पक्ष कुठे आहे ते शोधावं लागेल. जे जे प्रश्न येतील, जे काही आयुधांच्या माध्यमातून विचारलं जाईल, त्याला योग्य पद्धतीने न्याय देण्यात येईल म्हणाले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अजित पवार लवकर पहाटे काम करतात, मी उशीरापर्यंत काम करतो. आणि देवेंद्र फडणवीस तर ऑल राऊंडर आहेत. बॉलिंगपण करतात, विकेटपण घेतात, बॅटिंगपण करतात. चौकार, षटकार मारतात, फिल्डिंगपण चांगली करतात, असा मिश्किल टीपण्णीही यावेळी केली. त्यांच्या या वाक्यामुळे पत्रकार परिषदेत हशा पिकला होता.
विरोधकांच्या पत्रावर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार घातला आहे. परंतु, विरोधी पक्ष एकजुटीने राज्याच्या प्रश्नांना वाचा कशी फोडतील याबाबत उहापोह असतो. परंतु, त्यांनी जे पत्र पाठवलं ते अंतिम आठवडा पत्रासारखं पाठवलं आहे. विरोधी पक्ष गोंधळेलेला दिसतोय. आत्मविश्वास गमावलेला विरोधी पक्ष आहे. अवसान गळाल्यानंतर काय होतं, याचं चित्र निर्माण झालं आहे, अशी टीकाही केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी काही कोणाला कमी लेखत नाही. आमच्या कामाचा उरक आणि गती पाहून अजित दादांनी आम्हाला पाठिंबा दिल्यापासून तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेवटी संख्याबळालाही महत्त्व असतं. आज २१० पेक्षा जास्त आमदार सरकारच्या पाठीशी आहेत. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु, विरोधी पक्षाचा जो अधिकार आहे, राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधानसभेच्या अधिवेशात वाचा फोडली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, विविध आयुधं वापरली पाहिजेत. हे सर्व विरोधी पक्षाकडून अपेक्षित असतं. पण आज दुर्दैवाने तसं होताना दिसलं नाही, असंही सांगितले.