मुंबई : प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुढील आठ दिवस नाशिक मध्ये लॉकडाऊन आज जाहिर केला.
याकाळात नाशिकमधील सर्व शाळा, कॉलेज-महाविद्यालये आणि दुकाने बंद राहणार असल्याचे सांगत या लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भातील अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री यशोमंत्री ठाकूर यांनी अमरावती. अचलपूरमध्ये आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर केला. अमरावतीत आज दिवसभरात तब्बल ७०९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. दररोज वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अमरावतीत सोमवारी (२२ फेब्रुवारी) रात्री आठ वाजेपासून पुढच्या सात दिवसांसाठी कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन अमरावती शहर आणि अचलपूर शहरात असणार आहे. या लॉकडाऊन काळात नागरिकांना फक्त जीवनाश्यक वस्तू खरेदासाठी मूभा असेल. लॉकडाऊनच्या नियमांचं पालन केलं नाही तर संबंधित व्यक्तीविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी जिल्ह्यातील नागरीकांना दिला.
अकोला जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतोय. अकोल्यात आज दिवसभरात २२२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अकोल्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता थेट १३८६९ वर पोहोचला आहे. यापैकी ११४९६ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या २०२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
अकोल्यात गेल्या आठवड्यापासून नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २३ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान कडकडीत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यानुसार अकोल्यातील अकोला, मुर्तीजापुर आणि अकोट या परिसरात कडक लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, भाजी विक्रेत्यांना पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर लग्नासाठी फक्त २५ जनांना परवानगी असणार आहे.
वर्ध्यात कडक संचारबंदी सुरू आहे. नागरिकांनीही संचारबंदीला उत्सफुर्त प्रतिसाद दिला आहे. मात्र काही ठिकाणी संचारबंदीचा प्रवाशांना फटका बसलेला दिसत आहे. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने अनेक प्रवाशांना एसटी स्थानकातच ताटकळत राहावे लागले आहे. रेल्वेने वर्ध्यात आलेल्या प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत आहे. शनिवारी रात्री ८ वाजल्यापासून ते उद्या सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्यमुळे वर्ध्यातील नागरिक चांगदलेच घाबरले आहेत. त्यामुळे दुकानदारांनी स्वत:हून दुकाने बंद केली आहेत. औषधांची दुकाने वगळता वर्ध्यात सर्वच अस्थापना बंद असल्याने शहरात शुकशुकाट निर्माण झाला आहे.
नागपूरमध्ये कोरोना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असं आवाहनच नागरिकांना केलं आहे. तसेच अनिर्बंधपणे वागणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देतानाच गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन सक्त असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शिवाय, कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत आतापर्यंत नागरिकांकडून तब्बल १ कोटी रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील सर्व मंगल कार्यालये, रिसॉर्ट आणि लॉन्सवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरू नये म्हणून उद्या सोमवारपासून ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. खासगी डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
यवतमाळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढायला लागल्याने जिल्हाधिकारी ही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. कोरोनाचे नियम मोडल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी माहिती दिली. कोरोनाचं संकट वेळीच रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिस विभागाच्या मदतीने कडक कारवाईचे संकेत देतानाचा कोव्हिड-19 ची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि विलगीकरणावर भर, कोविड 19 रूग्णांची गैरसोय होवू नये यासाठी रुग्णवाहिका आणि कोविड केअर सेंटर्स पूर्ववत करण्याचे नियोजन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी स्थानिक बसस्थानक चौकात जिल्हाधिकार्यांनी थांबत नागरिकांना मास्क लावण्याची विनंती केली. तसेच विनामास्क फिरणार्यांना दंडही केला. तसंच यापुढेही रुग्ण वाढू नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स ठेवावं, अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.