मुंबईः नवनाथ भोसले
भारतीय शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी २०१७ हे वर्ष खास गेले आहे. या वर्षी गुंतवणूकदारांची संपत्ती तब्बल ४५.५ लाख कोटी रुपये वाढली आहे. अनेक कंपन्यांनी छप्पर फाडके परतावा दिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले. सरत्या वर्षात सेन्सेक्स आणि निफ्टीने २८ टक्क्यांनी जोरदार वाढ नोंदवली आहे.
त्याचबरोबर मुंबई शेअऱ बाजारातील लिस्टेड (नोंदणीकृत) कंपन्यांचे भाग भांडवल ४५ लाख ५० हजार ८६७ कोटी रुपयांनी वाढून १ कोटी ५१ लाख ७३ हजार ८६७ रुपयांवर ( २ दोन हजार ३०० अब्ज डॉलर) गेले आहे. वर्ष २०१७ च्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स २०८.८० अंकांनी वाढून ३४ हजार ५६.८३ वर बंद झाला. जागतिक शेअर बाजारांसाठीही हे वर्ष चांगले राहिले आहे. सरत्या वर्षात अनेक नव्या कंपन्या शेअर बाजारात उतरल्या आहेत. एकूण ३६ कंपन्यांनी आपले आयपीओ (प्राथमिक समभाग विक्री) आणले असून आयपीओंनाही गुंतवणूकदारांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
२०१७ मध्ये सेन्सेक्स ७४३०.३७ अंकाने वाढला म्हणजे यामध्ये २७.९१ टक्के वाढ झाली आहे. २७ डिसेंबरला सेन्सेक्स ३४ हजार १३७.९७ अंकांच्या आतापर्य़ंतच्या सर्वोच्च पातळीवर पोचला आहे.
देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणन रिलायन्स इंडस्ट्रीज पुढे
रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड ही सर्वाधिक भागभांडवल असणारी कंपनी राहिली आहे. या कंपनीचे भागभांडवल ५ लाख ८३ हजार ३४७.३४ कोटी रुपये झाले आहे. त्यापाठोपाठ टीसीएस ५ लाख १६ हजार ९३४.२२ कोटी रुपयांचा भाग भांडवलासहीत दुसऱ्या स्थानावर राहिली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर एचडीएफसी बँक आहे. बँचे भागभांडवल ४ लाख ८५ हजार २७२.६१ कोटी रुपये राहिले आहे. त्यानंतर आयटीसी (३ लाख २० हजार ७३०.९२ कोटी रुपये) आणि हिंदुस्थान युनिलिव्हर ( २ लाख ९६ हजार १२२.३१ कोटी) या कंपन्या अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर राहील्या आहेत.