मुंबईः प्रतिनिधी
गेल्या तीन वर्षात शासकिय कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे लोकाभिमुख निर्णय घेण्याच्या कामकाज प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, विश्वासार्हता आल्याची माहिती देत राज्यासमोरील अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत होत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
नरिमन पॉंईट येथील हॉटेल ट्रायडंट येथे फिक्कीच्यावतीने आयोजित एम–टेक २०१८ डीजीटल ट्रान्सफॉर्मेशन थ्रू ब्लॉकचेन या परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील गावा–गावांना डिजीटलच्या माध्यमातून जोडण्यासाठी फायबर नेट द्वारे महानेट हा प्रकल्प राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गॅप दूर करण्याचा प्रयत्नही सरकारकडून करण्यात येत आहे. त्यासाठी पब्लिक क्लाऊड धोरण राबविण्यात येणार असून इ गव्हर्नसच्या माध्यमातून यास अधिक चांगल्या प्रकारे गती येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाकडून तंत्रज्ञानाचा वापर करत सर्वात जास्त डेटा तयार केला जातो आणि वापरला जातो. या तंत्रज्ञानातील ब्लॉकचेन प्रणालीमुळे होणाऱ्या बदलाचे आपण साक्षीदार ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर तंत्रज्ञानात नवनवी प्रणाली पुढे येत असताना त्यात काही दोषही पुढे येत आहेत. हे दोष दूर करण्यासाठी स्टार्ट अप अंतर्गत सुरु झालेल्या कंपन्यांनी पुढे यावे आणि या तंत्रज्ञानाच्या वापरात येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सोल्यूशन्स द्यावेत असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.