नवरात्रीच्या काळात मुंबई महानगर प्रदेशातील मालमत्ता नोंदणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३७.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. घरांचा विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्य सरकारच्या महसुलात चांगली वाढ झाली आहे. नवरात्रीमध्ये झालेल्या मालमत्ता नोंदणीतून ४३५ कोटी रुपये राज्याच्या तिजोरीत जमा झाले आहेत.
रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म नाइट फ्रँकने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. आकडेवारीनुसार, नवरात्रीच्या १५ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या नऊ दिवसांत ४५९४ मालमत्तांची नोंदणी झाली. गेल्या वर्षीच्या नवरात्रीमध्ये एकूण ३३४३ गृहनिर्माण युनिटची नोंदणी झाली होती. त्या तुलनेत यंदा ३७.४ टक्के वाढ झाली. नवरात्रीच्या कालावधीत रोज ५१० घरांची नोंदणी झाली. तर गेल्या वर्षी दररोज सरासरी ३७१ युनिटची नोंदणी झाली होती.
याबाबत नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष शिशिर बैजल म्हणाले, ऑक्टोबरच्या पहिल्या १४ दिवसांत मालमत्ता नोंदणीचे प्रमाण कमी होते. गृहखरेदीदार श्राद्धाच्या वेळी मालमत्तेची नोंदणी करण्यास टाळाटाळ करतात. मात्र नवरात्रोत्सव सुरू होताच मालमत्ता नोंदणीत मोठी झेप घेतली. वर्ष २०२२ मधील नवरात्रीच्या तुलनेत २०२३ मध्ये मालमत्ता नोंदणीचे आकडे चांगले आहेत.
सणासुदीच्या काळात मालमत्ता विक्रीपासून ते रजिस्ट्रीपर्यंतचे आकडे उत्कृष्ट असतील, असे रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. महागडे गृहकर्ज आणि मालमत्तेच्या किमती वाढल्या असूनही घरांची मागणी मजबूत असल्याचे दिसून येते. आकडेवारीनुसार, २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये गृहनिर्माण युनिटची विक्री ९७ टक्क्यांनी अधिक होण्याची अपेक्षा आहे. २०२३ मध्ये एकूण ३.१२ लाख घरांची विक्री झाली होती.