मुंबई : प्रतिनिधी
बहारदार गायकीच्या बळावर गायक जावेद अलीने हिंदीसोबतच इतर प्रादेशिक भाषांमध्येही गायन करीत रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. मराठी चित्रपटांसाठी जावेदने गायलेली गाणी आज खूप गाजत आहेत. जावेदच्या गायनाने सजलेला ‘मेमरी कार्ड’ हा मराठी चित्रपट पुढील शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील गीत आपल्या गाण्यांच्या मेमरीत कायमचं फिट झाल्याचं जावेद मानतो.
अॅडलीब्स प्रोडक्शनची प्रस्तुती प्रितेश कामत आणि मितेश चिंदरकर यांनी निर्मिती-दिग्दर्शन केलेल्या ‘मेमरी कार्ड’ या चित्रपटामध्ये जावेदने एक हृदयस्पर्शी गीत गायलं आहे. या गीताबाबत बोलताना जावेद म्हणाला की, अनेक भाषांमध्ये मी गाणी गायलीत. प्रत्येक गाण्याची एक वेगळीच मेलडी असते जी मी अनुभवली आहे. मात्र ‘मेमरी कार्ड’ सिनेमातील लव्ह साँग माझ्यासाठी साँग ऑफ द इयर असेल. या गाण्याचा मी पुरेपूर आनंद लुटला आहे. प्रितेश कामत आणि मितेश चिंदरकर यांनी दिलेलं संगीत माझ्या काही खास कंपोझिशन्समध्ये राहील. या सिनेमाची मी आतुरतेने वाट पाहतोय. अप्रतिम आणि सायलेंट कंपोझिशन्सचं हे गोड कॉम्बिनेशन प्रेक्षकांना नक्की आवडेल. माझे गुरु आणि संगीतातील आयडियल मोहम्मद रफी यांच्या गाण्यांना असलेला गोडवा साधेपणा या दोघांनी नेमके पणाने या गाण्यात उतरविला. प्रेम ही एकमेव भावना जी जगाच्या पाठीवर कायम आणि सारखीच आहे अशी भावना गाण्यात ऐकायची असेल तर प्रितेश-मितेश यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं ‘मन उगाच हासते कशामुळे, हृदय ही धडकू लागते कुणामुळे!…’ हे एव्हरग्रीन साँग रेकॉर्ड करताना मी सुद्धा जवळपास दोन तास घेतले आणि त्यातील प्रत्येक क्षण माझ्या ‘मेमरी कार्ड’मध्ये सेव्ह करून ठेवला. गाण्याची ३० सेकंदाची ओपनींग पियानो ट्यून अलगद प्रेमाच्या दुनियेची सफर करून आणेल यात शंका नाही. कुठेही शब्दांची अतिशयोक्ती आणि जड फ्रेजेस नसल्यामुळे हे गाणं माझ्या प्रमाणे माझ्या मित्रांना देखील आवडलं.
जावेदच्या जोडीला शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर, सायली पाटील आणि मयूरी नार्वेकर आदी गायकांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. मनाली काळे आणि श्याम सामंत यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. गीतरचना मितेश-प्रितेश व श्याम सामंत यांनी लिहिल्या आहेत.