मुंबई : प्रतिनिधी
कृषी विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येतील असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य गिरीशचन्द्र व्यास यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
राज्यात कृषी विभागासाठी गट-अ ते गट-ड संवर्गातील एकूण २७ हजार ५०२ पदांचा आकृतिबंध मंजूर असून त्यापैकी १८ हजार ६२२ पदे भरलेली आहेत तर ८ हजार ८८० पदे रिक्त आहेत. यामधील तांत्रिक संवर्गाची २० हजार १८१ पदे मंजूर असून त्यापैकी १४ हजार ८०९ पदे भरलेली आहेत तर ५ हजार ३७२ पदे रिक्त आहेत. १६ मे २०१८ शासन निर्णयानुसार तांत्रिक संवर्गातील १०० टक्के पद भरतीस मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय संवर्गातील पदे भरण्यावर वित्त विभागाच्या ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्बंध असल्याने तूर्तास ही पदे भरता आली नाहीत, अशी माहितीही कृषी मंत्री दादाजी भुसे व राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली.
विधान परिषद सदस्य गिरीशचन्द्र व्यास, नागोराव गाणार आदींनी चर्चेत सहभाग घेतला.