पवई येथील आयआयटीचा विद्यार्थी दर्शन सोलंकी याने आत्महत्या केली असून आत्महत्ये प्रकरणी आयआयटीच्या संचालकांची हकालपट्टी करण्यात यावी आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी भीम आर्मीने आज पवई येथील आयआयटीवर धडक मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली. या संस्थेतील कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून सबंधितांवर कारवाई करावी यासाठी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
आयआयटी पवई येथे बी टेक प्रथम वर्षात शिकणा-या दर्शन सोलंकी याने नुकतीच आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या आहे की आणखी वेगळे कारण आहे याची चौकशी हौणे आवश्यक आहे. यापूर्वी रोहित वेमुला, पायल तडवी अशी गंभीर प्रकरणे घडली असून सोलंकीची आत्महत्या म्हणजे सरकारी संस्था म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे बळी घेणारे कारखाने आहेत काय असा सवाल केला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांनी यावेळी केली.
भीम आर्मीच्या शिष्टमंडळाने यावेळी संचालक चौधरी यांची भेट घेऊन यासंदर्भात जाब विचारला .
सदर आंदोलनात राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, महाराष्ट्र अध्यक्ष सीताराम गंगावणे,कार्याध्यक्ष सुनील गायकवाड,रमेश बालेश, मुंबई अध्यक्ष सुनील थोरात कार्याध्यक्ष अविनाश गरूड दिनेश शर्मा, अविनाश समिंदर , विजय कांबळे सुरेश धाडी, सागर कांबळे,महाराष्ट्र स्टुडन्ट युनियन अध्यक्ष सिद्धार्थ इंगळे, शशांक कांबळे सुशिलकुमार वर्मा, अॅलेक्स मोरे,सागर कांबळे, आसपाचे मुंबई अध्यक्ष कैलाश जैस्वार, आवेज भाई, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.