मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे, धार्मिकस्थळे पाडव्यापासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार पाडव्यापासून हि सर्व स्थळे सुरु होणार असली तरी या स्थळांवर प्रवेश करण्यास गरोदर महिला, ६५ वर्षावरील व्यक्ती आणि १० वर्षाखालील मुलांना प्रवेश देण्यास राज्य सरकारने मनाई करत प्रसाद वाटणे आणि प्रसाद म्हणून विशिष्ट पाण्याचे वाटप करण्यास बंदी घालण्यात आली असून यासंदर्भात जारी राज्य सरकारने आदेश जारी करण्यात आले.
या गोष्टी पाळाव्या लागणार-
कंटोन्मेंट झोन बाहेरील सर्व देवळे, प्रार्थनास्थळे, धार्मिकस्थळे सुरु करण्यास परवानगी.
प्रत्येक व्यक्तींमध्ये किमान ६ फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक.
या ठिकाणी येणाऱ्याला मास्क परिधान करणे बंधनकारक असून मास्कशिवाय प्रवेश नाही.
सतत हात सॅनिटायझर आणि हॅण्डवॉशने स्वच्छ करणे.
परिसरात थुंकण्यास मनाई.
प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंग करणे आणि सॅनिटायझरची व्यवस्था करणे बंधनकारक.
ज्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत अशा व्यक्तींनाच या ठिकाणी प्रवेश देण्यात यावा.
कोरोनाबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने माहिती असलेले पोस्टर, त्याचे व्हिडीओ किंवा ऑडियो परिसरात लावावीत.
परिसरात येणाऱ्यांसाठी वेळेचे नियमन करावे. तसेच परिसरात पुरेसे व्हेटिलेशन राहील याची पूर्णपणे खबरदारी घ्यावी.
परिसरात प्रवेश करण्याआधी संबधित भाविकांच्या चपला-बूट त्यांनी त्यांच्या वाहनात किंवा त्यांच्या कुटुंबियानी एकत्रित वेगळ्या ठिकाणी ठेवावेत. सरसकट एकत्रित ठेवण्यास मनाई.
परिसराच्या आत आणि बाहेर, पार्किंग क्षेत्रात गर्दी नियंत्रण करणारी व्यवस्था करावी. तसेच परिसरालगत असलेल्या दुकानांमध्ये पुरेशी सामाजिक अंतर राखले जाईल याची काळजी घ्यावी.
परिसरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांनी हात आणि पाय साबणाने स्वच्छ धुवूनच आतमध्ये प्रवेश करावा. बसण्यासाठीच्या जागीही पुरेसे शाररिक अंतर पाळले जाईल याची खबरदारी मंदीर प्रशासनाने घ्यायची आहे.
ईश्वराची मुर्ती, मजार, धार्मिक ग्रंथाना हात लावण्यास भाविकांना बंदी.
परिसरात अती गर्दी करण्यास बंदी.
धार्मिक गाणी लावण्यास किंवा धार्मिक गाण्याचे कार्यक्रम परिसरात करण्यास बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
लंगर, अन्नछत्र, कम्युनिटी किचन चालविण्यास परिसरात परवानगी परंतु पुरेसे शाररिक अंतर पाळणे बंधनकारक.
परिसर सातत्याने स्वच्छ आणि सॅनिटायझ करणे आवश्यक.
मंदिर, धार्मिकस्थळे, प्रार्थनास्थळांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दर आठवड्याला कोविड-१९ ची चाचणी करणे बंधनकारक.
शौचालये आणि जेवणाच्या ठिकाणी फारशी गर्दी टाळण्याची जबाबदारी मंदिर प्रशासनांची राहणार.
प्रत्येक मंदिर, धार्मिक आणि प्रार्थनास्थळांवर जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासनाच्या देखरेखीखाली राहतील.
परिसरात एखादा आजारी व्यक्ती आढळला तर त्यास लगेच वेगळ्या खोलीत शिफ्ट करावे आणि त्याची माहिती जवळच्या सार्वजनिक रूग्णालयास कळविण्यात यावी. तसेच त्याचा संपर्क आलेली ठिकाणे डिस इशन्फेशन करावीत.