Breaking News

आदिवासी खेळांचा क्रीडा विभागाच्या स्पर्धेत समावेश होणार मंत्री संजय बनसोडे यांची माहिती

आदिवासी युवक विविध कसरतीचे खेळ खेळतात. या खेळांमधील काही खेळांचा समावेश क्रीडा विभागाच्या स्पर्धेत करण्यात आला आहे. आणखी काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाशी सुसंगत खेळांचा समावेश क्रीडा स्पर्धेत करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

मंत्रालयात आयोजित क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हंजे, सहसंचालक सुधीर मोरे हे उपस्थित होते.

मंत्री बनसोडे म्हणाले की, खेळाडूंना केंद्रस्थानी मानून क्रीडा विभागाचे निर्णय घेण्यात येत आहेत. सर्वसामान्य, होतकरू आणि गरीब कुटुंबातील खेळाडूंना शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी जे आवश्यक असेल ती मदत त्यांना सराव आणि स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.

राज्यातील तालुका, जिल्हा आणि विभागीयस्तरावरील विविध क्रीडा संकुलांची बांधकामे सुरू असून ती दर्जेदार करून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे. तसेच ती कामे नियोजित वेळेत पूर्ण करून घ्यावीत. खेळाडूंना सरावासाठी देण्यात येणारा निधी कमी पडणार नाही आणि वेळेत मिळेल यासाठी लक्ष द्यावे.

विभागाकडे निधी विषयी मंजुरीसाठी प्रस्ताव असतील, तर ते तत्काळ सादर करावेत. नवीन योजना आणण्यासाठी खेळाडूंची बाजू समजावून घेण्याकरिता अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. यावेळी त्यांनी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या सर्व योजनांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. विभागात अधिकाधिक नवीन योजना राबविण्यात येणार असून त्यासंबंधी लवकर प्रस्ताव सादर करावेत. राज्याला क्रीडा क्षेत्रात जास्तीत जास्त प्रगतीकडे घेवून जाण्यासाठी कसलीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे सांगून विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेत कामे पूर्ण करावीत, अशा सूचना मंत्री बनसोडे यांनी दिल्या.

मंत्री बनसोडे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. कुलगुरूंची नेमणूक करण्यात आली आहे. सुरूवातीला साधनसामुग्री असलेल्या ठिकाणी विद्यापीठ सुरू करावे. इमारतीसह पायाभूत सुविधा ज्या ठिकाणी उपलब्ध होतील त्या ठिकाणी स्वतंत्र्यरित्या सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *