कुंभार समाज ओबीसी समाजात मोडतो. ओबीसी घटकांमध्ये कुंभार समाज लोकसंख्येने मोठा समाज असून ओबीसींच्या प्रश्नावर लढा देण्यासाठी पुढं आल पाहिजे. ओबीसींना आपले हक्क अबाधित ठेवायचे असतील तर सर्व ओबीसी घटकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्हा कुंभार विकास समिती आयोजित विद्यार्थी गुणगौरव, समाजभूषण व जीवनगौरव पुरस्कार समारंभ पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार देवयानी फरांदे, काँग्रेसचे शरद आहेर, कुंभार विकास समितीचे रमाकांत क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कुंभार समाजाला नवीन तंत्रज्ञान देण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची गरज आहे. त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल. ओबीसी घटकांना न्याय देण्यासाठी शासनाकडून नुकतीच मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे. सुमारे १२ हजार कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहे. ओबीसी समाजातील सर्व घटकांनी या योजनेचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे. जे पात्र लाभार्थी आहे त्यांच्या पर्यंत ही माहिती पोहचविण्याची आवश्यकता आहे. तसेच शासन स्तरावर ओबीसींचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपले प्रयत्न कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्काराचे वितरण
लिज्जत पापड उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कोते (पुणे), विश्वनाथ आहेर (ओझर),किसनराव जाधव (सिन्नर) यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात येत आहे. तर सेवानिवृत्त शासकीय अधिकारी नारायण करंगळे, पत्रकार गोकुळ सोनवणे (नाशिक), सुभाष कुंभार, रतिलाल कुंभार (शिरपूर), सेवानिवृत्त पोलिस अधिकारी भगवान सूर्यवंशी यांना समाजभूषण पुरस्कार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.