राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारला नुकतेच तीन महिने पूर्ण झाले. या तीन महिन्यात पहिल्यांदा वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क आणि आता टाटाचा नागपूर येथील एअर बस प्रकल्प गुजरातला गेला. त्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यासंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारला अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार असा सवाल केला.
यावेळी पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात ? असा संतप्त सवाल केला.
वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केली.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे हे यातून स्पष्ट होते असा थेट आरोपही करत जयंत पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्तांतर राज्याला वेठीस धरण्यासाठी झाले आहे का ? असा प्रश्न सध्या पडत आहे.