Breaking News

उद्धव ठाकरे यांची टीका, शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत… भाजपा आणि शिंदे गटावर केली सडकून टीका

शिवसेनेतील फुटीर गटाकडून आणि भाजपाकडून सातत्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिवसेनेची काँग्रेस केल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. त्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, २५ वर्षे ज्यांच्यासोबत राहिलो त्यांनी आतापर्यंत आमची दोस्तीच पाहिली. मात्र आता आमच्या मशालीची धगही सोसा असा गर्भित इशारा भाजपाला देत २५ वर्षे राहुनही शिवसेनेची भाजपा झाली नाही. मात्र काँग्रेसबरोबर गेल्याने शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त करत शिवसेनेची स्थापना कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी केली नसल्याची टीका शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर आणि भाजपावर केली.
जळगावात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने झालेल्या जाहिर सभेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, माझा जीव देश आणि जनतेसाठी जळत आहे. देशाला जाग करण्याचं काम वंशपरंपरागत माझ्याकडं आलं आहे. मध्ये मुंबईत ‘इंडिया’ची बैठक पार पडली. यांचं अध्यक्षपद शिवसेनेकडं होतं. बैठक पार पडल्यानंतर गद्दारांनी शिवसेनाप्रमुखांच्या फोटोसह बॅनर लावलं. त्यावर ‘मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही’ असं लिहिलं होतं. त्या बॅनरवरील वक्तव्याचा समाचार करताना उद्धव ठाकरे म्हणाले, २५ वर्षे शिवसेनेची भाजपा झाली नाही. मग, शिवसेनेची काँग्रेस कदापीही होणार नाही. शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत घेऊन हिंडवण्यासाठी केली नाही, असे सांगत आम्ही विरोधक एकत्र आल्यानंतर आम्ही इंडिया नाव घेतलं. तर त्यांनी लगेच देशाचं नाव भारत केलं. तुम्ही भारत म्हणा नाहीतर इंडिया म्हणा नाहीतर हिंदूस्थान म्हणा देश आमचाच आहे असेही सांगितले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण करताना स्टेज थोडं हालत होतं. मी म्हटलं, केंद्र सरकारचं हे प्रतिक असून, डगमगत आहे. पडतंय कधी कळत नाही. एवढे घाबरले आहेत की, आधी वाटायचं समोर कुणी आव्हान नाही. मात्र, सगळे देशप्रेमी एकत्र झाले आहेत. ‘इंडिया’ नावाची यांना खाज सुटली आहे. त्यामुळेच त्यांनी याचा पक्ष फोड त्याचा पक्ष फोड सारख्या गोष्टी करायला सुरुवात केल्याची टीका करत ते पुढे म्हणाले की, अरे खाज सुटली तर ती फोडायची नसते तर खाजवून खाज मिटवायची असते अशा शब्दात भाजपावर हल्लाबोल केला.

जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलिस हल्ल्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, जालना येथे माझा मनोज जरांगे पाटील हा मराठा समाजासाठी उपोषणाला बसला. पण त्या आंदोलनाच्या ठिकाणी जायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही पण दिल्लीत तिकडे जायला वेळ आहे असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावत मी पुन्हा येणार आहे असे सांगणारे आले मात्र ते हाफ होऊन आले असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेता लगावत मी पुन्हा येणार पण निवडणूका लागल्यावर परत येणार असेही यावेळी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, पुतळा कोणाचाही उभा करता येतो. काम करून जनतेने उपाधी दिल्याची काही तुरळक माणसं होऊन गेली. त्यात पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेल होते. त्यांचा पुतळा महानगरपालिकेच्या आवारात उभारलात आणि त्याचं अनावरण करण्याची संधी दिली यासाठी मी आभार मानतो, असं सांगत सरदार वल्लभभाई पटेल हा माणूस दुरदृष्टीचा होता. त्यावेळी त्यांनी आरएसएसवर बंदीही आणली होती. जगातला सर्वांत मोठा पुतळा कुठे उभा केला माहितेय. पुतळ्याची उंची ठीक आहे, कामाची उंची कधी गाठणार? असा खोचक सवाल म्हणत पुतळा उभारलात हे ठीक आहे, पण कामाची उंची गाठा ना, असा टोलाही नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावला.

यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांचा एक किस्सा सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, १७ सप्टेंबरला मराठा स्वातंत्र्यमुक्ती दिन आहे. त्यावेळी जिनांचं निधन झालं होतं. त्यामुळे अनेकजण म्हणाले की ही कारवाई पुढे ढकला. पण वल्लभभाई बोलले की, नाही आजच कारवाई होणार. त्यांनी फौजा घुसवल्या आणि मराठवाडा अभिमानाने भारतात सामील करून घेतला. आज आम्ही पुतळे उभारतोय जरूर. वल्लभभाईंनी जशी मराठवाड्यात कारवाई केली तशी मणिपूरमध्ये कारवाई करण्याची हिंमत होत नाहीय. हे कसले पोलादी पुरूष, हे तकलादू पुरूष, अशी उपरोधिक टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.

यावेळी बोलताना टरबूज असा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता खोचक टीका केली.

Check Also

विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *