पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव ठाकरे गटाच्या आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. विधानसभेच्या पायऱ्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केली.
ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा… ईडी सरकार हाय हाय.. फसवी मदत जाहीर करणार्या सरकारचा धिक्कार असो… नही चलेगी… नही चलेगी दादागिरी नही चलेगी… सरकार हमसे डरती है ईडी को आगे करती है…फिफ्टी- फिफ्टी… चलो गुवाहटी… गद्दारांना ताट – वाटी… चलो गुवाहाटी… चलो गुवाहाटी अशा घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विधानभवनाचा परिसर आजही दणाणून सोडला.
बुधवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधी पक्षाच्यावतीने आजही विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला धारेवर धरण्यात आले.
५० खोके… एकदम ओके… ईडी सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… बेकायदा सरकार हाय हाय…अशा घोषणांनी विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला अक्षरशः हैराण करून सोडले.
शिवसेनेत बंडखोरी करून जे आमदार गेले ते विधानभवनात ज्यावेळी येत होते त्यावेळी आले रे आले गद्दार आले… ५० खोके एकदम ओके… अशा जोरदार घोषणा आक्रमकपणे दिल्या जात होत्या.