मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उबाठा पेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

१९ जून रोजी पार पडणाऱ्या शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगाने आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीचा सविस्तर लेखाजोखा मांडला. या निवडणुकीत आपण संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे सेनेचे सर्व बालेकिल्ले राखले असून आता पूर्ण ताकतीने विधानसभेच्या तयारीला लागा असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. मात्र या निवडणुकीत झालेल्या चूका सुधारून आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक सक्षमपणे तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. १९ जून या वर्धापनदिनापासून पक्षाची सदस्य नोंदणी पुन्हा सुरू करणे, आपापल्या विभागात मतदारांची नोंदणी करून मतदार याद्या दुरुस्त करणे, तसेच विभागवार शिवदूतांच्या नेमणुका करणे याला प्राधान्य देण्यास सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या लोकसभा निवडणुकीत आपला स्ट्राईक रेट हा उबाठा सेनेपेक्षा उत्तम होता. त्यांनी २२ जागा लढवून ९ जिंकल्या तर आपण १५ जागा लढवून ७ जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट हा ४२ टक्के तर आपला ४८ टक्के एवढा आहे. दुसरीकडे मुंबईत त्यांच्यापेक्षा २ लाख जास्त मते आपल्याला मिळालेली आहेत. बाळासाहेबांचे छत्रपती संभाजीनगर आपण राखले असून कोकणातही जनतेने महायुतीलाच साथ दिलेली आहे. त्यामुळे जनता आपल्याला साथ देत आहे, असे असले तरीही महायुतीबद्दल या निवडणुकीत निर्माण झालेले चुकीचे चित्र आगामी विधानसभा निवडणुकीत पालटून टाकण्यासाठी आपल्याला अधिक जोमाने काम करावे लागेल असेही यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी ‘संविधान बदलणार’ असे खोटे नेरेटिव्ह तयार करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हे चित्र फार काळ टिकणार नाही. कारण केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील आपले सरकार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. त्यामुळे आशा चुकीच्या नेरेटिव्हची आगामी विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही असा निर्धार व्यक्त करून कामाला लागण्याच्या सूचना शिंदे यांनी केली. तसेच पंढरपूरच्या आषाढी वारीसहित, दहीहंडी, गणपती, दसरा, दिवाळी असे सर्व हिंदूंचे सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे करावेत असेही सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वारीला निघणाऱ्या पालख्यांचे पक्षाच्या वतीने जागोजागी स्वागत करावे तसेच त्यांची सोय करावी. तसेच गावागावात वाडी वस्तीवर शिवसेनेचे बोर्ड लागावेत, शाखा सुरू कराव्यात असेही सांगितले.

शिवसेना राबवणार वृक्षरोपणाची मोहीम

शेवटी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील तापमान प्रचंड वाढले होते. राज्यातील काही भागातील तापमान ५० ते ५२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात शासनाकडून वृक्षारोपण मोहीम राबवली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात १ लाख वृक्ष लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत मात्र त्यासोबत अशीच मोहीम पक्षाच्या वतीने राबवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने पुढाकार घेऊन कामाला लागावे असे निर्देश आजच्या बैठकीत दिले.

या मोहिमेअंतर्गत पक्षाच्या वतीने रोपे देण्यात येणार असून पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात ही वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. वाढते प्रदूषण आणि तापमानवाढ आटोक्यात आणण्यासाठी सामजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक शिवसैनिकाने या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *