Breaking News

अतुल लोंढे यांची टीका, मोदी देशासाठी तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी हानिकारक फॉक्सकॉनने माघार घेतल्याने मायक्रॉन सेमीकंडक्टर प्रकल्पावरही संशयाचे ढग

वेदांता-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर प्रकल्प पुण्याजवळ प्रस्तावित होता, पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी तो गुजरातला पळवण्यात आला. पण आता हा प्रकल्प गुजरातमध्ये साकार होणार नाही. वेदांताबरोबरच्या भागिदारीतून फॉक्सकॉनने माघार घेतल्याने हा प्रकल्प बारगळला आहे. हा प्रकल्प पुण्यात होणार होता, त्याची सर्व प्रक्रिया पार पडली होती, मविआ सरकारनेही सर्व सवलती व सुविधा देण्याची तयारी दर्शवली होती. पण महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला पळवून नेला पण आता तो तिथेही होत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे आणि पर्यायाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. म्हणूनच मोदी हे देशासाठी तर फडणवीस हे राज्यासाठी हानीकारक आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन हा महत्वाचा प्रकल्प गुजरात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्रातून पळवून नेला. तब्बल १.५ लाख कोटी रुपये गुंतवणुक व १ लाख नोकऱ्या निर्माण करणारा हा प्रकल्प होता. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी पुणे परिसरातील वातावरण अत्यंत अनुकुल असे आहे, पुणे हे औद्योगीक क्लस्टर असून विमानतळ, बंदरे आणि रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ, आवश्यक सोयी सुविधा या परिसरात उपलब्ध आहेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी द्यावयाच्या सुविधा व सवलतीसंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली होती पण हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आला. गुजरातमध्ये ज्या भागात य प्रकल्पाला जागा देण्यात आली त्या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहणे अशक्यच होते, शेवटी तेच झाले. हा प्रकल्प गेल्यामुळे देशाचे तब्बल १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प देवेंद्र फडणवीसांच्या हाताखालून गेला. राज्यातील लाखो तरुणांचे रोजगारही गेले. प्रकल्प गुजरातला नेला पण गुजरात सरकार व केंद्र सरकारने या प्रकल्पाना सोयी सुविधा दिल्या नाहीत असे रॉयटर या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

फॉक्सकॉनने वेदांताबरोबरचा करार मोडीत काढल्याने आता मायक्रॉन सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या भवितव्यावरही संशयाचे ढग जमा झालेत. वायब्रंट गुजरात व मेक इन इंडियाच्या नावाने मोठ-मोठ्या घोषणा केल्या गेल्या पण प्रत्यक्षात त्यातील किती प्रकल्प आले यावर श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे. फॉक्सकॉनने माघार घेतल्याने इतर कंपन्यांच्या परदेशी गुंतवणुकीवरही याचा परिणाम होऊन भारताचे नुकसानच होणार आहे. महाराष्ट्रातून याआधी वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, बल्क केमीकल्स यासह अनेक उद्योग व संस्था महाराष्ट्राबाहेर गेल्या त्याला भाजपा, फडणवीस हेच जबाबदार आहेत. रशिया-युक्रेनचे युद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी थांबवू शकतात पण देशातून जाणारे उद्योग मात्र थांबवू शकत नाहीत, हे दुर्दैवी आहे. सरकार कोणाचेही असो उद्योग निघून जाणे विकासाच्या दृष्टीने चांगले नाही, असेही लोंढे म्हणाले.

हिच ती कागदपत्रेः-

Check Also

पालघरचे खासदार डॉ राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश

पालघरचे विद्यमान खासदार डॉ राजेंद्र गावित यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *