भिवंडीच्या वलपाडा परिसरातील एक तीन मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवासी अकडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या कैलास नगर भागातील वलपाडा परिसरात ‘वर्धमान कंपाऊंड’ नावाची तीन मजली इमारत होती. या इमारतीच्या खाली एक गोदाम होते. तर वरच्या दोन मजल्यावर रहिवासी राहत होते. मात्र, आज दुपारी दीडच्या सुमारास अचानक ही इमारत कोसळली. त्यानंतर या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवासी अकडले असल्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी झाले असून ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, या दुर्देवी घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. नवनाथ सावंत ( ३५) आणि ललिता रवी मोहतो (२९ ) यांचा मृत्यू झाला आहे. तर मुख्तार रोशन मंसुरी (२६ ) चिकू रवी मोहतो (५) प्रिन्स रवी मोहतो ( ३ ) विकासकुमार मुकेश राजभर (१८ ) उदयभान मुनिराम यादव (२५ ) अनिता (३० ) उज्वला कांबळे (३० ) अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत. त्यांना भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.