मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांसाठी १९, ५३७ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास ३१ डिसेंबर उजाडेल असे वक्तव्य सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केल्यानंतर दोन तीन दिवसातच राज्य सरकारकडून ही घोषणा करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्य सरकारने काल बुधवारी १६ लाख ९८,११० शेतकऱ्यांच्या खात्यांसाठी ५ हजार ५८० कोटी रूपये मंजूर केले. याशिवाय, वन टाईम सेटलमेंट योजनेंतर्गत ६ लाख ०५, ५०५ शेतकऱ्यांच्या खात्यांसाठी ४ हजार ६७३ कोटी रूपये मंजूर केले. त्यामुळे आजपर्यंत एकूण सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यासाठी १४ हजार ८६४ कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून वन टाईम सेटलमेंटच्या ४६७३ कोटी रूपयांसह एकूण १९,५३७ कोटी रूपये मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविल्यानंतर एकूण ७७ लाख खातेधारक असून पुन्हा आलेले अर्ज आणि इतर त्रुटी दूर करून सुमारे ६९ लाख अर्जांवर प्रक्रिया करण्यात आल्याचा दावाही राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.
शेवटच्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत ही प्रक्रिया अशीच सुरू राहणार असल्याचे आश्वासनही राज्य सरकारकडून प्रसिध्दी पत्रकान्वये राज्यातील शेतकऱ्यांना दिले आहे.