मुंबई: प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्त्येचे प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील तरूण शेतकऱ्याने मंत्रालयातच आत्महत्या करण्यासाठी विषाची बाटली सोबत घेवून मंत्रालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयातील पोलिसांनी सदर शेतकऱ्याकडून किटकनाशकाची बाटली काढून घेत त्याचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे मंत्रालयात येवून शेतकऱ्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न फसला. ही घटना संध्याकाळी ४.३० वाजता घडली.
सोलापूर जिल्ह्यातील तरूण शेतकरी मारूती सदाशिव धावरे हा स्वत:च्या शेतात पिकविलेला ऊस केवळ ऊस घेवून जाण्यासाठी शेतातून रस्ता नसल्याने वैतागला होता. त्याच्या शेजारील शेतकऱ्याकडून धावरे याला ऊस नेण्यासाठी रस्ता दिला जात नव्हता. या शेतकऱ्याबरोबर त्याने वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मंत्रालयातील तक्रार करून यावर मार्ग काढण्यासाठी सातत्याने त्याने प्रयत्न केले. मात्र त्याच्या प्रयत्नाला यश येत नसल्याचे पाहून अखेर धावरे याने मंत्रालयात आत्महत्या करण्याच्या इराद्याने टायगोर किटकनाशकाची बाटली सोबत घेवून मंत्रालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांच्या तपासणीत ही बाब उघड झाल्यानंतर त्याला मंत्रालयात प्रवेश नाकारला.