मुंबईः प्रतिनिधी
नियोजित इंदू मिल स्मारकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आता पुतळ्यासाठी असणारा चबुतरा हा १०० फुटाचा तर प्रत्यक्ष पुतळ्याची उंची ३५० फूट राहणार असून एकूण ४५० फुटाचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
तसेच पुतळा आणि चबुतऱ्याच्या उंची वाढीस राज्याच्या मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्रालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वरील माहिती दिली. त्यांच्यासोबत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे ही उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून पदभार स्विकारल्यानंतर इंदू मिल स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला. तसेच तेथील स्मारकाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यापूर्वीच्या राज्य सरकारने काही परवानग्यांची पूर्तता न होताच स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन केले. मात्र आता केंद्र सरकारशी संबधित जवळपास सर्वच परवानग्या मिळालेल्या आहेत. तरीही राज्यातील अन्य काही स्थानिक विभागांच्या, संस्थांच्या परवानग्या घेण्याचे शिल्लक राहीलेले असले तर त्या परवानग्या ८ दिवसाच्या आत देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. स्मारकाचे काम दोन वर्षात पूर्ण करायचे असल्याने त्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणणे गरजेचे आणि मान्यता देणे आवश्यक होते. त्यानुसार स्मारकाचा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत आणून मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
स्मारकाच्या कामासाठी लागणाऱ्या निधीत वाढ करण्यासही मान्यता देण्यात आली असून यापूर्वी ७०० कोटी रूपयांची मान्यता देण्यात आली होती. ती आता एक हजार ८९ कोटी रूपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीचे काम जगप्रसिध्द शिल्पकार राम सुतार यांना देण्यात आले असून हा पुतळा कांस्यधातूत तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन वर्षात प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार असून यासाठी लागणारा आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देणार आहे. या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
Tags ajit pawar dhananjay munde dr.babasaheb ambedkar memorial indu mill dadar
Check Also
तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान
लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …