२०१८ साली काढलेल्या शासन निर्णयाचे पाप हे देवेंद्र फडणवीसांचेच असून मोतीलाल नगर, आदर्श नगर, रेक्लमेशन अदानीला आणि धारावी करांना इथल्या जागेवरून मिठागरांच्या जमिनीवर नेऊन वसवणार आणि पुन्हा मिठागरांच्या जमिनीचा पुर्नविकास म्हणत त्या जमिनीही पुन्हा अदानीच्या घशात घालणार असा असा आरोप करत मुंबई काय तुमच्या मालकीची आहे का, मुंबई इथल्या माणसांची आहे, कष्टकऱ्यांची आहे. कोणीतरी इथे येणार आणि इथल्या लोकांना अपात्र ठरविणार तुम्ही अपात्र ठरविणारे कोण असा सवालही शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यानी केला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईत मेट्रोसाठी आपण कांजूरची जागा दिली, पण मेट्रोच्या जमिनीत दलाली खायची असल्याने ती मिठागरांची जमिन असल्याचे भाजपा सरकारने सांगितले. बुलेट ट्रेनसाठी जागा आपण मुंबईकरांसाठी राखीव होती. ती जागा बुलेट ट्रेनसाठी देत त्या जागेचे काम पुन्हा अदानीला दिले, अन्य काही विकास कामे अदानीला दिले. त्यातच आता अदानीला पुन्हा धारावी पुर्नविकासाचे काम दिले. अख्खी मुंबई काय अदानीला देऊन येथील सगळंच गुजरातला नेण्याचा डाव आहे. इथल्या लोकांना मिठागरांच्या जमिनीवर नेवून वसवायचे आणि त्या मिठागरांच्या जमिनीचा विकासाचे कामही पुन्हा अदानीला द्यायचे असा घाट देवेंद्र फडणवीसांचा असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे यांनी धारावीकरांना ५०० चौरस फुटाच्या सदनिका द्या या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात केला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, धारावीबाबत २०१८ साली काढलेल्या शासन निर्णयाचे पाप देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. कारण त्यावेळी तुम्ही खोक्यांच्या मदतीने आमचे सरकार पाडलात आणि तुम्ही जाऊन बसलात अन आम्ही इकडे बसलोय. त्यामुळे त्या शासन निर्णयाचे पाप तुमचेच असल्याचा पलटवार देवंद्र फडणवीस यांच्यावर केला.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, धारावीकरांना ३५० चौरस फुटाचे घर देण्यापेक्षा बीडीडी चाळीच्या धर्तीवर ५०० चौरस फुटाची सदनिका द्या अशी मागणी करत महाविकास आघाडी सरकारच्या काळात वांद्रे वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांना तेथेच हक्काचे घर देण्याचा निर्णय घेतला आहे. नाही तर तुम्ही ती वसाहतही भाजपाच्या जावयाला अर्थात अदानीला द्याल असा उपरोधिक टोला लगावत ठाकरे म्हणाले, असेल तुमच्यात हिंमत तर तुम्ही धारावीच्या पुनर्विकासात टोलेजंग इमारती उभारण्यापेक्षा सफाई कामगारांना घरे द्या, पोलिसांना घर द्या, आमच्या गिरणी कामगारांना घरे द्या अशी मागणीही केली.
सत्ता येते जाते पण तुमचं रेकॉर्ड कशाला खराब करता
या मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी अदानीची सुपारी घेतलेल्यांनी अनेक जणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच काही गुप्तचर विभागाच्या पोलिसांना या कामासाठी नेमलेले आहे. त्यामुळे पोलिसांना माझे स्पष्ट सांगणे आहे की, सत्ता येते जाते पण तुम्ही तुमचे रेकॉर्ड कशाला खराब करता असा इशारा देत इथे सगळेच जण ऐकत असतात, इथली जनता ही ऐकतेय असा सूचक इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.