मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील शाळा १७ ऑगस्टपासून करण्याचा विचार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. त्या अनुषंगाने आज अखेर शासन निर्णय जारी करत चला मुलांनो शाळेत चला या अभियानातंर्गत ग्रामीण भागात ५ ते ७ वी आणि शहरी भागात ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली. त्यामुळे शाळांमधील वर्ग भरण्यास आता सुरुवात होणार आहे. मुंबई, उपनगर, ठाणे मध्ये शाळा सुरु करण्याबाबत परिस्थितीचा आढावा घेवून शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबर काळजीग्रस्त असलेल्या शहरांमधील शाळा सुरु करण्यासाठी संबधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
महापालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये वार्ड ऑफिसर, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी-शिक्षण निरिक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे.
तर नगरपंचायत-नगरपालिका-ग्रामपंचायतस्तरावर शाळा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी-जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक-माध्यमिक) यांचा समावेश करण्यात आला असून या समित्या ग्रामीण आणि शहरी भागातील शाळांबाबत निर्णय घेणार आहे.
याचबरोबर शाळा सुरु करण्यापूर्वी किमान महिनाभर गावात, शहरात कोविड बाधितांची संख्या कमी झालेली असावी अशी अट घालण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शाळेत पालकांची गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेच्या परिसरात येण्यास मनाई करण्यात यावी, शिक्षकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. एका वर्गात किमान १५ ते २० विद्यार्थी बसविण्याची व्यवस्था करावी, विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल तर दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान ६ फूटाचे अंतर राहील याची काळजी घ्यावी, तसेच दोन सत्रामध्ये शाळांचे आयोजन करावे, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे, लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना तात्काळ घरी पाठविणे आणि त्यांची कोरोना चाचणी करून घेणे, एखादा विद्यार्थी कोविडग्रस्त आढळून आला तर संपूर्ण शाळा बंद करून निर्जंतुकीकरण करावे आणि वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने उपचार सुरु करावेत अशा सूचना शाळांना शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत.
शाळा सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय खालीलप्रमाणे:-
शाळा सुरु करताना आणि केल्यानंतर करावयाच्या गोष्टी खालीलप्रमाणे :-