नाना पटोले यांची मागणी, जनतेला लुटण्यापेक्षा एसटी महामंडळातील भ्रष्टाचार थांबवा एसटीची भाडेवाढ तात्काळ रद्द करा; एसटी भाडेवाढीची जबाबदारी मंत्र्यांना झटकता येणार नाही

विधानसभा निवडणुकीत जनतेवर सवलतींचा वर्षाव करणाऱ्या भाजपा युती सरकारने सत्तेत येताच जनतेला लुटण्याचे काम सुरु केले आहे. आधीच महागाईवर नियंत्रण मिळवण्यात भाजपा युती सरकार सपशेल अपयशी ठरले असताना आता राज्यातील सर्वसामान्य जनतेची जीवन वाहिनी असलेल्या एसटीच्या तिकिटदरात १५ टक्के वाढ करून सरकार जनतेला लुटत आहे. ही तिकीट दरवाढ तात्काळ रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, एसटी बस सेवा राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरु आहे, पण महामंडळाला ही सेवा व्यवस्थित देता येत नाही. एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात तर एसटी बसची अवस्था पहावत नाही, शिवशाही नावाने सुरु केलेल्या बससेचीही दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना व्यवस्थित सेवा देत येत नाही आणि दुसरीकडे महागाईचे कारण देत १५ टक्के भाडेवाढ केली आहे. एसटीच्या भाडेवाढीची परिवहन मंत्र्यांनाच माहिती नाही असे स्वतः मंत्रीच सांगत असतील तर त्यांनी पदावर कशाला रहावे? आपल्या खात्यात काय चालले आहे? याची माहितीच मंत्र्यांना नाही हे आश्चर्यकारक आहे. ज्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना विश्वासात न घेताच भाडेवाढीचा निर्णय घेतला त्यांना निलंबित करा. जनतेची लूट करणारा निर्णय माहित नसणाऱ्या मंत्री महोदयांना एसटी महामंडळाची राज्यातील १३६० हेक्टर मोकळी जागा बिल्डरांच्या घशात घालण्यात जास्त रस दिसत आहे. एसटी महामंडळ हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे, हा भ्रष्टाचार थांबवला तरी भाडेवाढ करण्याची गरज पडणार नाही असेही सांगितले.

गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) आजाराकडे लक्ष द्या..

राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) आजाराचे रुग्ण वाढत आहेत. या आजाराने सोलापुरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमीही प्रसार माध्यमातून आली आहे. राज्यात १०० पेक्षा जास्त रुग्णांना या रोगाची लागण झाली असून १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचे समजते. या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलावीत, योग्य ती खबरदारी घेऊन जनजागृती करावी. राज्य सरकारने युद्ध पातळीवर यंत्रणा कामाला लावून या रोगाचा प्रसार होऊ नये यावर भर दिला पाहिजे. दुषित पाणी व अस्वच्छतेमुळे हा आजार होत असल्याचे समजते. ११ वर्षापासून ‘हर घर नल, हर नल में जल’ तसेच ‘स्वच्छता मोहिम’ राबिवली जात असतानाही स्वच्छ पाणी मिळत नसेल तर या योजना फक्त जाहिरातीतच दिसतात, असे म्हणावे लागेल असे नाना पटोले म्हणाले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *