नागपूर : प्रतिनिधी
मुंबईतील संभावित अतिवृष्टी आणि आमदारांच्या राहण्याच्या प्रश्नामुळे राज्य सरकारने मोठ्या हौसेने राज्याची उपराजनाधी असलेल्या नागपूरात पावसाळी अधिवेशन बोलावले. मात्र हे अधिवेशन काही सरकारला फायद्याचे ठरत नसल्याचे दिसून येत असून काल सोमवारी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या टेबलवरील माईक बंद पडलेला असताना आज दुसऱ्या दिवशी जवळपास सर्वच मंत्यांचे माईकच बंद पडल्याने सत्ताधाऱ्यांना पर्यायी माईकची मदत घ्यावी लागल्याचे चित्र विधानसभेत पाह्यला मिळाले.
पावसाळी अधिवेशन नागपूरात बोलाविलेल्या दुसऱ्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. त्यामुळे विधानभवनाचा परिसर जलमय होऊन विधान सभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. त्यातच काल रात्री विधेयकांवरील चर्चा सुरु असताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांचे आसनच तुटले. त्यामुळे विधानसभेतील वस्तूंच्या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
आतापर्यत अधिवेशन सुरू असताना अशा पध्दतीच्या घटना कधीच घडल्या नाहीत. परंतु यंदा पहिल्यांदाच अशा पध्दतीच्या घटना घडत असल्याने नागपूरचे अधिवेशन काही सरकारला लखलाभाचे ठरत नसल्याची भावना अधिवेशनाला आलेल्या आमदारांकडून बोलून दाखविली जात आहे.