राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्याच्या मागणीवरून शिवसेनेच्या खासदारांमध्ये दोन तट निर्माण झाल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली. त्यातच आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याने राष्ट्रपती पदासाठी आजच मतदान होत असल्याने शिवसेनेचे सर्व खासदार दिल्लीला गेलेले. मात्र आज एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीला शिवसेनेच्या एकूण १८ खासदारांपैकी १२ खासदारांनी चक्क दिल्लीहून ऑनलाईन पध्दतीने हजेरी लावल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
आज सकाळपासून शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान सैनिक रामदास कदम आणि शिवाजी आढळराव पाटील यांनी शिवसेना अखेरचा जय महाराष्ट्र केल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर राष्ट्रपती निवडणूकीसाठी मतदान पार पडल्यानंतर १२ खासदार हे एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीला हजर झाल्याची माहिती पुढे आली आहे.
शिवसेना खासदारांच्या मनात सुरू असलेली खदखद लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा दिला. त्यानुसार आज राष्ट्रपतीपदासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
राष्ट्रपती पदाच्या मतदानानंतर शिंदे गटाची ऑनलाइन पद्धतीने एक बैठक पार पडली आहे. या बैठकीला शिवसेनेच्या १२ खासदारांनी हजेरी लावली होती. या बैठकीत जवळपास अर्धा तास चर्चा झाली. गटनेते पदासाठी राहुल शेवाळे आणि मुख्य प्रतोदपदासाठी भावना गवळी यांच्या नावाची चर्चा देखील झाल्याची माहिती समजत आहे. शिंदे गट सध्या नवीन गट स्थापन करण्याच्या तयारीत असून त्याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रात्री दिल्लीला रवाना होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
विशेषत: २० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदेसह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीतील निकालावर बंडखोर गटाचे भवितव्य ठरणार असले तरी तत्पूर्वीच आपलीच शिवसेना खरी असल्याचे दाखविण्यासाठी पक्षात उभी फुट पाडण्यासाठी सर्वच पध्दतीने शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.