परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यातच खरीप पिकांबरोबरच रब्बी पिकंही हातची गेली असल्याने काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांनासमोर निर्माण झाला आहे. मात्र परतीच्या पावसांने उघडीप देऊन तीन-चार दिवस झाले तरी राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही की, पंचनामे झालेले नाहीत. या सगळ्या गोष्टीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
या दौऱ्याबाबत स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या गोष्टीला दुजोरा दिला असून काही ठिकाणी मी आणि मुख्यमंत्री एकत्र तर काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र दौरे काढणार आहोत असे स्पष्ट केले. मात्र, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा हा महाराष्ट्र दौरा आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधकांनी या दौऱ्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.
बारामतीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंद बागेतील शरद पवारांच्या घरी आज दिवाळीनिमित्त भेट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांच्याही भेटी घेतल्या. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना आधीच भेटल्याचा संदर्भ देत पुढे म्हणाले, आता पार दुष्काळाचं वाटोळं झालं आहे. ओल्या दुष्काळाबाबत मी स्वत: दिवाळीच्या आधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. तेव्हाच मी म्हणालो होतो की परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. एकतर सगळ्यांची खरीपाची पिकं गेली. रब्बीचीही पिकं गेली. शेतकऱ्याला आता काय करावं आणि काय करू नये हे सुचत नाहीये. तो इतका चिंतेत आहे की विचारता सोय नाही.
आज सण आहे. आज कुणावर टीका करून सणाच्या उत्साहावर विरजण घालण्याचं काम मला करायचं नाही. आजचा सण संपू द्या. उद्या त्यावर माझी किंवा पक्षाची भूमिका मांडण्याचं काम आम्ही करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, शेतकऱ्यांची काळजी शिंदे-फडणवीस सरकार किती घेतयं हे राज्यातील जनतेला दाखविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मंगळवारी शेतकऱ्यांसोबत वर्षा या शासकिय निवासस्थानी दिवाळी साजरी केली.