राज्यातील सध्या विविध राजकिय प्रश्नावर आपली भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांना कामासंदर्भात फोन करून वेळ मागतो, पण फोन केल्यावर दादा काळजी करू नका लवकरच देऊ…दोघेही पॉझिटीव्ह बोलतात निगेटीव्ह बोलत नाहीत. कुठलं काम आहे काय आहे विचारतात मात्र वेळ काही मिळत नाही. त्या दोघांचे काय सुरू आहे माहित नाही. त्यांचे त्यांनाच माहीत. आम्हाला नुसतं खेळवतायत की फक्त चालढकल करत आहेत की वेळ मारुन नेतायत हे कळायला मार्ग नाही अशी खोचक टीका केली.
हे सरकार गोरगरीबांचे नाही ‘सर्वसामान्यांचे… सर्वसामान्यांचे सरकार’ आहे असा टोला अजित पवार यांनी लगावतानाच मी कामासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेळ मागतो त्यावेळी कॉल केल्यानंतर ‘दादा देऊ काही काळजी करू नका’ लवकरच देऊ..दोघेही पॉझिटिव्ह बोलतात निगेटिव्ह अजिबात बोलत नाही. कुठलं काम आहे काय आहे विचारतात मात्र वेळ काही मिळत नाही. त्या दोघांचे काय सुरू आहे माहित नाही. त्यांचे त्यांनाच माहीत. आम्हाला नुसतं खेळवतायत की फक्त चालढकल करत आहेत की वेळ मारुन नेतायत हे कळायला मार्ग नाही. कुणी वेळ मागितला तर वेळ द्यायचा असतो. सत्तेवर नसताना सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह बोलणं सोपं असतं पण सरकारमध्ये आल्यानंतर त्या निर्णयाबद्दलचा फायनल निर्णय घेऊन पुढे मार्ग काढणे ही तारेवरची कसरत असते. परंतु तसे काम करताना हे सरकार पहायला मिळत नाही. पण सुरु आहे आमचं ‘सर्वसामान्यांचे सरकार’ बोलणं मात्र कुठेही महागाई कमी करण्याचा, कारखाने बाहेर गेले ते परत येण्याकरिता प्रयत्न होत नाहीत उलट बाहेरचे मुख्यमंत्री येतात आणि इथल्या उद्योगपतींना, बॉलिवूड आणि वेगवेगळ्या क्षेत्रांना तुम्ही आमच्याकडे चला बोलत आहेत. तरीही आमचे ‘सर्वसामान्यांचे सरकार ‘सुरू आहे अशी जोरदार टीका अजित पवार यांनी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत १५ दिवस अगोदर बैठक मुख्यमंत्री यांनी घ्यायची असते. कुठले प्रश्न महाराष्ट्राचे असावेत याबाबत पुस्तिका काढली जाते. परंतु ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली गेली. मुद्दामहून कुणी टाळले नाही. डॉ. अमोल कोल्हे मुंबईत होते म्हणून ते बैठकीला गेले बाकीचे खासदार दिल्लीत होते असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.