राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा भाजपाच्या महिला कार्यकर्त्यीने नोंदविल्यानंतर आव्हाड यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहिर केले. या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तातडीने आव्हाड यांच्या घरी पोहचत समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र जितेंद्र आव्हाड हे राजीनामा देण्याच्या मुद्यावर ठाम असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देत पुढे म्हणाले, आव्हाड यांनी माझ्याजवळ राजीनामा दिला आहे. यासंदर्भात मी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोललो आहे. ते आता यावर पुढील निर्णय घेतील. तसेच जयंत पाटील म्हणाले की, मुद्दे नसले की गुद्द्यांवर येऊन प्रत्येकवेळी नवा विषय उकरून काढत विरोधात बोलणाऱ्याला अटक कशी होईल हाच मनसुबा सत्ताधाऱ्यांचा आहे. मात्र सर्वांगीण महाराष्ट्राच्या विकासासाठी वाटेतील काट्यांशी लढत आम्ही पुढे जाऊ. कारण महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद आणि विश्वास आमच्या पाठीशी आहे असा आत्मविश्वास ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला.
सत्तेचा सदुपयोग करून सर्वसामान्य जनतेचे हित साधण्याऐवजी सत्तेला हुकूमशाहीचे अस्त्र मानून त्याचा दुरुपयोग विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी, त्यांची सर्व बाजूने कोंडी करण्यासाठी केला जातोय असा थेट आरोपही त्यांनी केला.
साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर करून सत्ताधारी स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यात व्यस्त आहेत. मात्र राज्यातील जनतेचा अकार्यक्षम सरकारविरोधातील आक्रोश वाढला की स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आणि विरोधकांनी आवाज उठवला की त्यांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा, राज्यातील पोलीस यंत्रणा यांचा वापर करून दडपशाही सुरु आहे असल्याचेही ते म्हणाले.