जालाना / मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग, धुळे या भागात आज सकाळी गारपीट आणि अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सकाळी थोडाच वेळ पडलेल्या पावसात छोट्या दगडांच्या आकाराच्या गारांचा पाऊस बुलढाणा, जालना जिल्ह्यात पडला. तर इतर भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.
या गारपीट आणि अवकाळई पावसाची तात्काळ दखल घेत कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी या गारपिटीमुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने करण्याचे आदेश यांनी देत जिल्हाधिकारी प्रशासनाने उद्या अर्थात सोमवारी विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी त्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले.
राज्यातील ज्या भागात आज अवकाळी पाऊस व गारपीट झाली त्याचा आढावा कृषीमंत्र्यांनी घेतला. त्यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाबाबत चर्चा केली.
ज्या गावांमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या उभ्या पिकाचे तसेच काढणी पश्चात मळणीसाठी ठेवलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे. त्याबाबत माहिती त्वरित विमा कंपन्यांना कळवावी. यासाठी जिल्हाधिकारी, कृषी अधिकाऱ्यांनी उद्या संबंधीत विमा कंपन्यांची बैठक घ्यावी व त्यांना झालेल्या नुकसानाबाबत गावनिहाय शेतकऱ्यांची माहिती द्यावी. त्याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवसातील माहितीही इमेल द्वारे देण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून संबंधित विमा कंपनीला बाधित शेतकऱ्यांची आकडेवारी उपलब्ध करून देता येईल.
स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे तलाठी, ग्रामसेवक, सहायक कृषी अधिकारी यांनी देखील पंचनामे जिल्हा प्रशासनाला सादर करून मदतीबाबत प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.