देशाचे भविष्य आणि भवितव्यासाठी निवडणुका आहेत. देशाचे अनेक जणांनी नेतृत्व केलं. देशाच्या भवितव्यची चिंता कधी नव्हती. पण गेले दहा वर्ष पाहिलं असता, आता बदल केला पाहिजे असं वाटतंय असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर इथे आयोजित महाविकास आघाडीच्या वतीने महासभा एकनिष्ठतेची शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्या शरद पवार बोलत होते.
यावेळी मंचकावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षाचे नेते खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे , आमदार शशिकांत शिंदे ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात काँग्रेसचे आमदार संग्राम दादा थोपटे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सभेला मोठ्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आज मी तुमच्यासमोर बारामती लोकसभेच्या मतदार संघाच्या उमेदवार म्हणून सुप्रियाचे नाव म्हणून जाहीर करतोय. सुप्रिया सुळे यांचे संसदेतील काम बोलकं आहे. सध्या देशामध्ये शेतकऱ्यांविरोधात ज्या प्रकारे काम सुरू आहे. त्याला आवर घालायचा असेल तर मतदान करायला जाल, तेव्हा ‘तुतारी’वर शिक्का मारा, असे आवाहन करत बारामतीतून सुप्रिया सुळे यांची उमेदवारीही यावेळी केली.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, संग्राम थोपटे तुम्ही या तालुक्यासाठी, राज्यासाठी, देशासाठी जे काही कराल त्यासाठी मी तुमच्या मागे राहीन. या आधी आपले रस्ते वेगळे असतील किंवा नसतील पण तुम्ही आमच्या सोबत रहा. शरद पवार पाठिशी असल्यावर विकास काय असतो हे मी तुम्हाला दाखवून देईन असा इशाराही यावेळी भाजपाला दिला.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मी जेव्हा देशाचा कृषीमंत्री झालो तेव्हा देशात फक्त एक महिना पुरेल एवढा अन्नाचा साठा उपलब्ध होता. अनेक निर्णय घेऊन ही परास्थिती बदलली. एक दिवशी यवतमाळातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी मनमोहनसिंग यांना भेटलो आणि त्यांना म्हटले की आपण या शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याने आत्महत्या का केली हे पाहिले पाहिजे. आम्ही गेलो आणि कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केल्याच समजलं. त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
शरद पवार यावर सविस्तर बोलताना म्हणाले की, मोदी फक्त गुजरातचा विचार करतात. ते इतर साधन संपत्ती हिसकावून गुजरातला नेतात. गुजरातबद्दल आम्हाला आस्था आहे, पण महाराष्ट्राचं नुकसान करुन गुजरातला फायदा केला जातोय. जो व्यक्ती राज्याच्या बाहेर विचार करत नाही तो देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही असेही सांगितले.
माझी लढाई अदृश्य शक्तीशी- खासदार सुप्रिया सुळे
मला तिन्ही लोकसभा निवडणुकीत मोठ्या मतधिक्यान निवडून दिलं त्याबद्दल आभार. सत्ता होती तेव्हा संघर्ष केला नाही,पण राऊत साहेब तुम्हाला पहिल्या पासून संघर्ष आहे, आता संघर्षाची सवय होत आहे. माझी राज्यात कोणाशी लढाई नाही, ही लढाई दिल्लीच्या तक्ताच्या या अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्यात महाविकास आघाडीची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे राज्य येईल तेव्हा ह्या राज्यांमध्ये सगळ्यात मोठी सरसकट कर्जमाफी कोण करेल. ते आमचे सरकार करेल, दहा लाख कोटी रुपये माफ केले या भारतीय जनता पक्षाने १० लाख कोटी रुपये ते उद्योगपतींचे माफ केले. त्यांना दहा लाख कोटी रुपये उद्योजकांचे माफ करायला आहेत. पण आपल्या शेतकऱ्यांचे नाहीत असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाविकास आघाडीच्या सभेतून खासदार संजय राऊत यांचा भाजपावर हल्लाबोल
विकासाच्या नावाखाली लोक सोडून गेले. कशाला जातो रे तू? विकास करायला जातो. भारतीय जनता पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकास पुरुष, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विकासाची कितीतरी महान दृष्टी, पण विकास करायला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेची, काँग्रेसची माणसं लागतात. मला त्यादिवशी फार सुंदर कविता वाचण्यात आली. ती अशी नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला, त्याच्याकडून जमेना म्हणून बारामतीचा बघितला, तो पुरे ना म्हणून नांदेडवाल्याचा हात धरला, बघू आता तरी कमळाबाईच्या पोटी विकास पैदा होता का अशी या कवितेच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला.
या सरकारने, मोदीने गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या जणांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे, पण मला एक स्पेशल भारतरत्न मोदींना द्यायचा आहे. त्यासाठी मी शरद पवारांची परवानगी घेईन. इतक्या जलद गतीने फेकाफेक करणारा माणूस या जगात दुसरा जन्माला आला नाही. तो भारतात जन्माला आला, तो भारतीय जनता पक्षात जन्माला आला. या लोकांना कसंकाय सूचतं? कुठे ट्रेनिंग मिळते? यांची कुठे कार्यशाळा आहे? असा सवालही राऊतांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रियाताई तुमच्यावर मताचा पाऊस पडणार- बाळासाहेब थोरात
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पवार साहेब भाषण करताना आम्ही खराखुरा पाऊस पडताना पाहिला होता पवार साहेब भाषण करत होते मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असताना देखील त्यांना ऐकण्याकरिता आलेल्या कार्यकर्त्यांनी डोक्यावर छत्री न घेता पावसात भिजत पवार साहेबांचे भाषण ऐकत होते पवार साहेबांनी देखील पावसामध्ये भिजत भाषण केले होते. तो पाऊस देखील आम्ही पाहिलेला आहे. परवा बारामतीत एका कार्यक्रमात टाळ्यांचा आवाजाचा पाऊस आम्ही ऐकला. आता सुप्रियाताई तुम्हाला मताचा पाऊस पाहायचा आहे. राज्याच्या विकासासंदर्भात कुठले एका विषयावर चर्चा होत असेल तर पवार साहेबांचं नाव निघणार नाही असा कुठलाही विषय नसतो ज्या ठिकाणी चर्चा सुरू असते त्या ठिकाणी पवार साहेबांचं नाव निघत असते. राज्याच्या प्रत्येक विकासात स्वतःला झुकून देणार एकमेव नेता म्हणजे शरद पवार साहेब आहे तुमच्या आणि आमच्या अंतरकरणात स्थान निर्माण करणार व्यक्तिमत्व म्हणजे पवार साहेब आहे असे बाळासाहेब थोरात म्हणाले.