मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने सर्वसामान्य मुंबईकरांना मागील १० महिन्यापासून लोकलने प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली. मात्र आता ही बंदी लवकरच उठविण्यात येणार असून याबाबतचा निर्णय लवकरच सर्वांसाठी सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. मात्र लोकल सेवा सर्वांसाठी १ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यावेळी प्रशासनाने १ फेब्रुवारी पासून लोकल रेल्वे सेवा सुरु करावी असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आला. परंतु १ फेब्रुवारी फारच लवकर होत असल्याचे सांगत नकार दिल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह, यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरु करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.