सध्या शिर्डीत सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरात भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टीका केली. यावेळी टीका करताना अजित पवार म्हणाले होते की, ज्या घरात वाढलो त्याच घराला उध्वस्त करणे म्हणजे बेईमानी असल्याची खोचक टीका मुख्यमंत्री शिंदेवर केली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोठा असंतोष असल्याचे वक्तव्य केले. अजित पवार यांच्या टीकेला शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले.
यावेळी प्रत्युत्तर देताना शंभुराज देसाई म्हणाले, मग त्यावेळी ४८ तासाचे सरकार बनवलं ती बेईमानी नव्हती का? असा खोचक सवाल अजित पवार यांना केला.
२०१९ मध्ये जे ४८ तासांचं सरकार तुम्ही केलं होतं, ती बेईमानी नव्हती का? तुमच्या पक्षाचे काही आमदार घेऊन तुम्ही पहाटेचा शपथविधी केला. तो करताना शरद पवार जे तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांची परवानगी घेतली होती का? त्यांना विचारलं होतं का? असा जर प्रश्न तुम्हाला आम्ही विचारला तर तुम्हाला ते योग्य वाटणार नाही. असेही ते म्हणाले.
आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षासोबत जाऊन, मुख्यमंत्री होणं एकवेळेस समजू शकतो. त्यात गैरवाटण्याचं एकवेळ कारण नाही. पण ज्या घरात वाढलो, ज्या घरात आपण घडलो ते घरच उध्वस्त करायला निघणं ही बेईमानी महाराष्ट्रातील लोकांना अजिबात पटलेली नाही अशी टीका अजित पवार यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली होती.