बीडः प्रतिनिधी
शेतकऱ्यांनी आपले प्रश्न घेवून दिल्लीत गेले परंतु तिकडे मंत्री भेटलेच नाहीत. उलट शेतकऱ्यांच्या अंगावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. दुसऱ्याबाजूला महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य असलेल्या कर्नाटकने तेथील परिस्थिती पाहून तातडीने दुष्काळ जाहीर केला. राज्यात आणि केंद्रात सत्ता तुमची असताना मग प्रश्न कुठे आहे असा सवाल करत राज्यात एकाबाजूला छत्रपतींचा आशीर्वाद मागणारेच दुसऱ्याबाजूला शेतकऱ्यांवरच अन्याय करत असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली.
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उध्दव ठाकरे हे बीडमध्ये आले. त्यानंतर ते तळेगांव येथे जावून तेथील शेतकऱ्यांच्या भेट घेवून विचारपूस केली.
राज्यातील गंभीर परिस्थिती असून अनेक ठिकाणची तळे आटलेले आहेत. तरीही राज्यात दुष्काळ जाहीर करण्याऐवजी राज्य सरकार फक्त कागद काळे करत असून सरकारने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
पूर्वी हिंदू आणि हिंदूत्व बोलण्याची ताकद कोणात नव्हती. तेव्हा शिवसेनाप्रमुक बाळासाहेब ठाकरे यांनी गर्व से कहो हम हिंदू है चा नारा दिला. याशिवाय खरी शिवशाही आणायची असेल तर लोक आपल्याकडे येण्याऐवजी सरकारने लोकांकडे गेले पाहिजे असा त्यांचा दंडक होता. त्यामुळेच २०१४ साली आपण हिंदू म्हणून एकत्र आल्याने हे सरकार सत्तेवर आले. आपणही या सरकारसोबत होतो. पण त्यानंतर काय पहायला मिळालं असा सवाल उपस्थित करत नोटबंदी, जीएसटी आणि दरवाढ झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले असून जनतेच्या पदरात काहीच पडले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
निवडणूकीपूर्वी राम मंदीर उभारणीचे आश्वासन देण्यात आले. पण राम मंदिरचं काय झालं? राम मंदिरासाठी अनेक पिढ्या गेल्या. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, पण राम मंदिरसाठी कायदा केला, तर निर्णयाचा प्रश्नच नाही. आमच्यावर काँग्रेसवाले टीका करतात की निवडणूक आली की राम आठवतो, पण त्यांना कधी राम आठवला असा खोचक सवाल करत आमच्यावर टीका करणारे काँग्रेसवाले सगळीकडे माथा टेकवत असल्याची टीका केली.
यावेळी 2019 मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आणणारच असा विश्वास व्यक्त करत मला शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा कारण मला राज्य उभारायच आहे. तुम्हाला काही तरी द्यायचे असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
Tags bjp cm fadnavis farmers pm narendra modi shivsena uddhav thackeary
Check Also
पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार
भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …