वाशिम येथील गायरान जमिनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यमान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर ताशेरे ओढत पदाचा दुरूपयोग केल्याचा ठपका ठेवला. यासंपूर्ण प्रकरणाची पोल खोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. त्यानंतर विधान परिषदेत सभापती आणि विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले.
सुरुवातीला विरोधकांचा स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर विरोधकांनी या मुद्यावर चर्चेची मागणी करत अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. मात्र सरकारकडून चर्चेची मागणी फेटाळून लावत पुढील कामकाज तसेच पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गोंधळ तसाच कायम ठेवला. अखेर पाच वेळा विधानसभेचे तर विधान परिषदेचेही पाच वेळा कामकाज तहकूब करावे लागले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य झाल्याने आज दिवसभराचे कामकाज पुढे ढकलत कामकाज तहकूब केले.
राजीनामा द्या राजीनामा द्या अब्दुल सत्तार राजीनामा द्या… अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी झाली पाहिजे… गायरान बेचनेवालों को जुते मारो सालों को… ५० खोके एकदम ओके… सत्ताराने घेतले खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके… वसुली सरकार हाय हाय… श्रीखंड घ्या कुणी, कुणी भूखंड घ्या… अशा घोषणा देत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होत वेलमध्ये उतरत खाली बसून जोरदार निदर्शने केली.
अब्दुल सत्तार यांच्यावर हायकोर्टाने गायरान जमीन प्रकरणात ताशेरे ओढले आहेत हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला.
शिवाय माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.