नागपूरः प्रतिनिधी
तब्बल तीन दशकानंतर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पहिल्यांदाच नागपूरात होत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांचा कामकाज पाहण्यासाठी आणि त्यांचा आक्रमकपणा बघण्यासाठी शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांनी आज विधानसभेत हजेरी लावत काही काळ सभापतींच्या गँलरीत बसून कामकाज पाहिले. नेमका हाच मुद्दा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी काही पक्षाचे युवा नेते विधानसभेत आल्याने काहीजणांना जरा जास्तच प्रश्न सुचत असल्याचा चिमटा शिवसेनेला काढला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले हसू लपविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना आपले हसू काही केल्या रोखता आले नाही.
आदीत्य ठाकरे हे विधानसभेत बसल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे सर्व सदस्य सभागृहात जातीने हजर होते. तसेच भुजबळ यांना शिवीगाळ केल्याचे प्रकरणावर सभागृहात चर्चा सुरू असताना दोन वर्षापूर्वी शिवसेनेच्या दोन आमदारांनाही पोलिसांनी मारहाण केल्याचा मुद्दा यावेळी शिवसेनेने उपस्थित केला. तसेच यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी सातत्याने करत होते. त्यामुळे या कालावधीत शिवसेनेचे सदस्य सोडले तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अपवादानेच बोलताना दिसून येत होत.
त्यानंतर लक्षवेधी सूचनांवरील चर्चे दरम्यान सभागृहातील वातावरण फारच गंभीर झाले. त्यामुळे सभागृहात आलेला गंभीरपणा हलका करण्यासाठी अजित पवार यांनी आदीत्य ठाकरे आणि शिवसेनेचा थेट नामोल्लेख टाळत आज जरा पक्षाचा नेता आल्याने काहीजणांना जरा जास्तच प्रश्न सुचत असल्याचा चिमटा काढला. पण अजित पवारांच्या या चिमट्यावर शिवसेनेचे सर्वच आमदार मात्र चिडीचूप होते.