राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची राज्य सरकारवर टीका
जळगाव – चोपडा: प्रतिनिधी
या सरकारच्या नाकर्तेपणा मुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी करत लोकांचे विकासाचे प्रश्न सोडवायला यांच्याकडे पैसा नाही. परंतु यांच्या घोषणा करण्याचं काम सुरुच आहे. गरीब गरीब होत चालला आहे आणि अदानी – अंबानी श्रीमंत होत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन निर्धार यात्रा चोपडा येथे आल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेली अजित पवार यांच्यासह नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, दिलीप वळसे-पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष अरूण गुजराती यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
शाहू – फुले – आंबेडकर यांचा विचार दाबण्याचा प्रयत्न होत आहे.जातीयवादी लोक हे करत असून यांना आवरण्याची गरज आहे. पवार साहेबांचे स्थान दिल्लीमध्ये वाढवण्यासाठी त्यांना साथ द्या असे आवाहनही त्यांनी केले.
भाजप शिवसेनेचे सरकार आल्यानंतर वनदाव्याचे प्रश्न सुटलेले नाही. त्यासाठी ही परिवर्तन यात्रा आहे. नवीन पिढीचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला साथ असे आवाहन करत रुमण्याचा हिसका दाखवल्याशिवाय आपण गप्प बसायचे नाही असे त्यांनी सांगितले.
चांगल्या संस्था मोडण्याचे भाजपचे काम-भुजबळ
सत्तेत आल्यावर या भाजप सरकारने देशातील उत्तम संस्था मोडीत काढण्याचे काम केल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी केला.
कुपोषणाने हजारो मुले दगावत आहेत… अरे काय चालले आहे या राज्यात असा सवाल करतानाच या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. पाण्यासाठी लोक तडफडत आहेत आणि गुजरातला पाणी देण्याचा डाव सरकारने आखला आहे असा आरोपही त्यांनी केला.
एवढं सुंदर महाराष्ट्र सदन बांधले. परंतु बनवणारा मात्र जेलमध्ये गेला. १०० कोटीचे कॉन्ट्रॅक्ट आणि मग मला साडे आठशे कोटी कसे मिळतील असा सवाल करतानाच महाराष्ट्र सदन बांधलेल्या ठेकेदाराला एक रुपयाही सरकारने दिला नसल्याचे त्यांनी सांगितले.
यांना राममंदिर बनवायचं नाहीय… यांना सरकार बनवायचं आहे… पुन्हा एकदा जातीजातीमध्ये भांडणं लावून तुम्ही मुर्ख आहात हे दाखवून दयायचे असे काम सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन महिने संपल्यावर मोदींचा सिनेमा संपणार आहे – जयंतराव पाटील
मोदींच्या सरकारचे दोन महिने शिल्लक असून हे दोन महिने संपल्यावर मोदींचा हा सिनेमा संपणार आहे. शरद पवार साहेबांनी शेतकर्यांचे कर्ज माफ केले होते. करपा रोग आला, त्यावेळी ८० कोटी रुपये दिले आणि आता शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही. एवढ्या थापा मारल्या आहेत की हे आता शेतकऱ्यांना कळून चुकल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
कर्जमाफी करण्याची दानत यांच्यामध्ये नाही. पाच राज्यात पराभव झाल्यावर आता हे सरकार सगळं द्यायला लागले आहे हे लक्षात घ्या. सत्तेचा माज वाढतो त्यावेळी त्यांचा माज जनताच उतरवते आणि हेच आता होणार असेही ते म्हणाले.