Breaking News

मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार, मुंबईत गुलाल उधळण्यासाठी जाऊ अन्यथा…

मराठा आरक्षणाच्या मागणीप्रकरणी अंतरावली सराटे येथून लाखो मराठा समाज बांधवांना सोबत घेऊन राज्य सरकारच्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला नवी मुंबई पोलिसांनी वाशीतच अडवले आहे. मात्र आज २६ जानेवारी असल्याने आज मुंबईत जाणार नसल्याचे सांगत उद्या मात्र एकतर गुलाल उधळण्यासाठी मुंबईत जाऊ किंवा आपले उपोषणाचे आंदोलन सुरु करण्यासाठी जाणार असल्याचा पुनश्च निर्धार आज मनोज जरांगे पाटील यांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा समाजातील मोठ्या प्रमाणावर नागरिक आलेले असल्याने उद्या जर मनोज जरांगे पाटील हे मुंबईत पोहोचले तर मुंबईतील पायाभूत सुविधांवर ताण पडणार आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि रस्ते महामार्गावर ट्रॅफीक जॅम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अटकाव न करता मुंबईकरांचे कुठलेही मार्ग अडविले जाणार नाही याबाबत राज्य सरकारने काळजी घ्यावी असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना मुंबई बाहेरच रोखण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु झाले आहेत. तसेच मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारत जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यादृष्टीने एक पाऊल पुढे टाकलेले आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काल रात्री उशीरा काही संभाव्य जीआरच्या प्रती घेऊन सामाजिक न्याय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास दूत मंगेश चिवटे हे ही मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले होते.

त्यातच जरांगे पाटील यांनी आज संध्याकाळी उपस्थित समुदायाला मराठा समुदायाला संबोधित करताना राज्य सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची याची वाचत सांगितले की, मराठा समाजातील ज्या व्यक्तीची वंशांवळीची यादी कुणबी असल्याचे सापडली असेल तर त्या व्यक्तीस कुणबी जात प्रमाणपत्र त्वरीत देण्याची कार्यवाही केलेल्या मागणीप्रमाणे राज्य सरकारने सुरु केली आहे. याशिवाय शिंदे समितीकडून कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरु असून त्यास सातत्याने मुदतवाढ देण्यात येण्यासंदर्भातची मागणी राज्य सरकारने मान्य करत कुणबी नोंदी शोधण्याचे काम तसेच सुरु ठेवण्यासही मान्यता दिली आहे. याशिवाय राज्य सरकारने मराठा आंदोलना दरम्यान सुरु मराठा युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबतचे आश्वासन दिले होते. तसेच ते सर्व गुन्हे मागे घेण्याचे मान्य केले होते. पण त्यासंदर्भातील आदेश अद्याप जारी करण्यात आलेले नाहीत. याशिवाय सग्या सोयऱ्यांनाही कुणबी असल्याचे जात प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात आली होती. ती मागणीही राज्य सरकारने मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र त्याबाबतचा आदेश अद्याप जारी केला नाही. त्यामुळे हा आदेश जारी केल्यास मराठा आंदोलक मुंबई आझादा मैदानावर गुलाल उधळण्यासाठी जाऊ आणि आदेश जर काढला नाही तर मात्र आंदोलनाच्या भूमिकेवर आपण ठाम असून आंदोलन करण्यासाठी मुंबईत जाणारच असा निर्धारही यावेळी बोलून दाखविला.

याशिवाय मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनी एकत्रित येऊन समाजाला सांगावे अशी मागणीही केली.

तसेच यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुंबईतले रस्ते आणि गल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना माहित नाहीत. त्यामुळे चुकून कुठे गेले असतील पोलिसांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना सोडून द्यावे तसेच चुकून एखाद्या रस्त्याला गेला असेल तर काही वाईट घटना घडवून आणण्यासाठी मराठा कार्यकर्ता गेला असे समजून कारवाई करू नये अशी विनंतीही यावेळी पोलिस प्रशासनाला केली.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांची आणि त्यांची थांबण्याची व्यवस्था वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील मंडईच्या मोकळ्या जागेवर करण्यात आली असून तेथेच त्यांच्या जेवणा खाण्याची आणि मुक्कामाची सोय करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईतील डबेवाल्यांनी काम बंद ठेवत मराठा समाजाच्या मदतीसाठी मंडईत आल्याचेही सांगण्यात येत आहे.

Check Also

एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *