राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात येऊ घातलेले मोठे उद्योग प्रकल्प गुजरातमध्ये गेले. त्याचबरोबर तेलंगणामध्येही गेले. या उद्योग जाण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. पण, याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या विधानांमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. त्यामुळे राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्यानं काहीही नुकसान होणार नाही, असे विधान राज ठाकरे यांनी पिंपरीत सुरु असलेल्या १८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनात घेण्यात आलेल्या प्रकट मुलाखती दरम्यान केले.
राज ठाकरेंच्या या समर्थन करणाऱ्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाव न घेता टीका केली.
या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाणं, हे अतिशय चुकीचं आहे. त्यातून बेरोजगारी, बेकारी प्रचंड वाढत आहे. असे असताना मग मुलांनी काम कुठं मागायचं. लाखो कोटी रुपयांचं प्रकल्प गेल्याने रोजगार बुडाला असल्याचे सांगितले.
यावेळी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यातून गेलेल्या प्रकल्पावरून राजकीय व्यक्ती समर्थन करत असेल तर दुर्दैव आहे. प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी सर्व राज्यकर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आर्थिक सुबत्तता निर्माण होऊन तेथील भागात रोजगार निर्माण होतील, असेही स्पष्ट केले.
१८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांच्यासह काही जणांनी घेतली. त्यावेळी महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात जाण्याबाबत प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला त्यावेळी राज ठाकरे उत्तर देताना म्हणाले, महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. महाराष्ट्राचं काय होणार? असा टाहो आपण उगाच फोडत असतो. आपल्याकडे जे आहे, ते जरी टीकवलं तरी महाराष्ट्र सर्वांच्या पुढे आहे. राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचं काहीही नुकसान होणार नाही. मात्र, आपण महाराष्ट्र जोपसणं गरजेचं आहे. प्रत्येकाने या गोष्टीकडे नीट बघणं आवश्यक आहे, असेही सांगितले.