मागील महिनाभरापासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाचे समर्थन भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने समर्थन करण्यात येत आहे. मात्र फडणवीस हे समर्थन करत असले तरी त्यांच्याच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्यातील खदखदीला वाट मोकळी करून देत म्हणाले की, मनावर दगड ठेवत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले असल्याचे वक्तव्य केले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, त्यांनी दगड मनावर की डोक्यावर ठेवावा हा त्यांचा प्रश्न असल्याचे सांगत मला त्यावर बोलायचे नाही असे स्पष्ट करत अधिक बोलण्याचे टाळले.
पुण्यात झालेल्या कार्यक्रमानंतर शरद पवार हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
त्यातच एकनाथ शिंदे यांना झेड सुरक्षा व्यवस्था उध्दव ठाकरे यांनी नकार दिल्याचा प्रश्न सध्या चांगलाच गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवरही शरद पवार यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, आधीच झेड सुरक्षाव्यवस्था असलेल्या एकनाथ शिंदे यांना गडचिरोलीचे पालकमंत्री या नात्याने अधिक सुरक्षा होती. त्यामुळे शिंदे यांची सुरक्षा काढून घेतल्याचा दावा तथ्यहीन आहे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सरकार असेच चालवायचे आहे, की संबंध सत्ता केंद्रित ठेवून दोघांनी चालवायचे ही भूमिका घेतलेली दिसते. त्याला राज्यातल्या आणि केंद्रातल्या सहकाऱ्यांची संमती दिसते असेही ते म्हणाले.
मला वस्तुस्थिती माहित नाही. पण, शासनात अनेक वर्ष काम केल्याने मला हे माहिती की सुरक्षा पुरवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ घेत नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याची चर्चा होत नाही. मुख्य सचिव, गृह सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्या समितीमध्ये त्याचा निर्णय होतो. एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षाव्यवस्था होती आणि गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने त्यांना अधिक सुरक्षा होती. माजी गृहमंत्र्यांनी हे सांगितले आहे. त्यामुळे अधिक काही बोलायची गरज नसल्याचेही ते म्हणाले.
राज्यातील सत्ताबदलासाठी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे लागले, या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानासंदर्भात विचारले असता त्यांनी दगड मनावर ठेवावा की डोक्यावर हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याविषयी मला काही बोलायचे नाही.
नारायण राणे यांना संपविण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यासंदर्भात विचारले असता शरद पवार यांनी अत्यंत खोचक शब्दात म्हणाले, पोराबाळांच्या मुद्द्यावर मी बोलणं योग्य नसल्याचे मत व्यक्त केले.