राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांसह विकास कामांसाठी मुबलक निधी उपलब्ध करून दिला. पण आर्थिक अडचणीमुळे कधीही निधी अडविला गेला नाही. मात्र आता महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर नव्या आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर घोषणा केल्या पण त्याचे पैसे अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले नाहीत. त्याचबरोबर अर्थसंकल्प होऊन पाच महिने झाले तरी अनेक विकास कामे करणाऱ्या ठेकेदारांची कोट्यावधीची बिले अद्याप दिली नसल्याने सगळे कंत्राटदार हवालदिल झाल्याचे सांगत या गोष्टी पाहणं शिंदे-फडणवीसांचे काम नाही का? ते काय करतायत असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला.
मुंबईतील संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती त्यावेळी अजित पवार यांनी बोलताना केला.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने नुकतीच नवीन जाहिरात प्रसारित केली. त्याची टॅगलाईन “देखो आपला महाराष्ट्र” अशी आहे. या जाहिरातीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली. अजित पवार म्हणाले, या सरकारला मराठी भाषेची सुद्धा अडचण आहे. सरळ ‘पाहा आपला महाराष्ट्र’ म्हणा ना. परंतु यांना भाषेशी काही देणंघेणं नाही अशी खोचक टीकाही केली.
तसेच बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगताना अजित पवार म्हणाले, मुंबईचं मराठीपण टिकवण्यात, मान सन्मान देशाच्या कानाकोपऱ्यात वाढवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. आणखी एक महत्त्वाचं काम त्यांनी केलं. ते म्हणजे शिवसेनेमुळे मुंबई टिकली. मुंबईत मराठी माणसाचा अभिमान, मराठी माणसाचा स्वाभिमान कायम राहिला. बाळासाहेबांमुळे मराठी माणूस एकजुटीने राहिला. हे वास्तव आपल्याला नाकारता येत नाही. परंतु हेच नेमकं काहीच्या डोळ्यांवर यायला लागलं. म्हणून काही लोकांना फोडण्याचं राजकारण झालं असेही सांगितले.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांना अद्यापही कळत नाही की देशाचा पंतप्रधान कोण आणि राष्ट्रपती कोण? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा उल्लेख शिंदेंनी थेट पंतप्रधान असा केला. इतकेच नव्हे तर परवा एका उद्योगपतींच्या कार्यक्रमात मुंबईतील रस्त्यावर साडेतीनशे ५० कोटी रूपये खर्च केल्याचे सांगितले. आता ही कोणती नवी रक्कम आणली असा खोचक सवाल करत जर आपण मुख्यमंत्री आहात, एखादी गोष्ट लक्षात रहात नसेल तर त्याची नोट काढावी अन् ती वाचून दाखवावी अशी सूचनाही केली.
भाजपाच्या आमदारांकडून सध्या करण्यात येत असलेल्या टीकेवरून अजित पवार बोलताना म्हणाले की, तसेच मागील काही दिवसांपासून टिल्ली पिल्लीही लोक काहीही बोलत असून ते काय बोलतात त्याचं त्यांना कळेनासं झालं आहे. ते काय बोलतात हे टी.व्ही.चॅनलवाल्यांनाही दाखवावं असे वाटत नसल्याचा उपरोधिक टोला भाजपा आमदार नितेश राणे यांना लगावला.